Sunday, June 8, 2008

चाहूल... ...नाटक... १९९८

चाहूल

चंद्रलेखा प्रकाशित
चिरंतन निर्मित

दोन अंकी नाटक... चाहूल..

लेखक : प्रशांत दळवी
दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी
कलाकार : तुषार दळवी
सोनाली कुलकर्णी

कथासूत्र :
मकरंद आणि माधवी या तथाकथित आधुनिक, शहरी जोडप्याची एका रात्रीत घडणारी ही गोष्ट...मकरंद ऒफ़िसमधून घरी आलाय आणि चिडचिड करतोय , नंतर त्यामागचं कारण असं कळतं की त्याच्या बॊसनं माधवीला एक रात्र त्याच्याबरोबर लोणावळ्याला पाठवण्याची विनंती केलीय...
मग एकमेकांवर दोषारोप ( तूच जास्त नटतेस वगैरे आणि ती म्हणते तिथेच त्याला ठणकावून शिव्या देऊन नकार का नाही कळवलास वगैरे)... मग चर्चेलाच तोंड फ़ुटते.... पावित्र्य म्हणजे काय?(किराणा सामान आणलेलं आहे...) त्यातल्या प्रत्येक चैनीच्या गोष्टीची ( शांपू, पावडर, बॊडी लोशन , डिओ स्प्रे वगैरे ) आपल्याला खरंच गरज आहे काय?...( मग थोडं फ़ार समर्थन सुरू होतं ) कदाचित आपली लाचारी, वाढत्या गरजा, आणि स्वप्नं त्याला दिसली होती .....सर्वच गोष्टींचं बाजारीकरण... गरज आणि चैन यातला फ़रक काय , गरज कुठे संपते आणि चैन कुठे सुरू होते??...दोघे दारू पिऊन बोलत राहतात... मग पुढेपुढे सगळे नैतिक अध:पतनाचं भाबडे, खोटे समर्थन करत करत दोघे झोपतात...... सकाळ होते, घाईघाईने आवराआवर , तयारी करत माधवी बाहेर पडते, बाहेर जाताना एवढंच विचारते " पुरेसे भांडलो ना रे आपण ?" तोही मोजकंच बोलतो ," तू नि:शंक मनाने जा... प्रामाणिकपणाची चैन परवडणारी नाहीये आपल्याला..."
ती गेल्यावर मात्र मकरंद पलंगावर कोसळतो आणि डोक्यावरून पांढरी चादर ओढून घेतो,आणि मागे सारे आकाश चिरून टाकणारा हा आवाज कसला येतोय? तो आतला आवाज तर नक्कीच नाही..
____________________-

मी हे नाटक पाहिलं त्याला आता १० वर्षं झाली... अजून तो शेवटचा सीन आणि अनंत अमेंबल यांचं शेवटचं संगीत आठवतं..... इतका परिणामकारक शेवट असलेलं अस्वस्थ करणार नाटक मी अजून पाहिलेलं नाही... मी एकटाच पहायला गेलो होतो, बरोबर कोणीच नव्हतं... अत्यंत अस्वस्थ होऊन, आत्ममग्न अवस्थेत थरथरत राहिलो होतो काही काळ... अध:पतनाचं समर्थन आपल्याला पटतंय की काय, या विचाराने चिडचिडच व्हायला लागली..हे आपलं अध:पतन म्हणायचं का नाटककाराचं यश? बराच वेळ झोप आली नाही... दुसया दिवशी मित्राला पूर्ण स्टोरी सांगितली , सर्व ग्रुप घेऊन पुन्हा ते नाटक बघायला गेलो... असं कुठे असतं का? असं कोणी करतं का ?हे नाटक आवडणारा माणूस स्वत: तरी असं करेल का? वगैरे वगैरे पुष्कळ प्रश्न मित्रांच्या चर्चेत पुढे आले...सगळ्यांची उत्तरं द्यायला मी समर्थ नव्हतोच...मी गप्प बसलो... accepting indecent proposal या घटनेपलिकडे जाऊन त्यातली चर्चा मनाला लावून घ्यायला कोणी तयार नव्हतं..
________________________

मग २००० साली पॉप्युलर प्रकाशनाने काढलेले नाटकाचे पुस्तक सापडले... त्यात संवादांपेक्षाही प्रशांत दळवी यांनी लिहितानाचे आणि नाटक स्टेजवरती आल्यानंतरचे काही अनुभव लिहिले आहेत... खास त्यासाठी हे पुस्तक घ्यायलाच पाहिजे..
त्या प्रस्तावनेतील काही खास भावलेली वाक्यं द्यायचा मोह इथे आवरत नाहीये...

"...मकरंद आणि माधवी.....स्त्रीत्त्व किंवा पुरुषत्व हे त्यांचं समसमान भागभांडवल होतं, बाकी बुद्धिमत्ता आणि अधिकाराच्या बाबतीत तर समानताच होती,त्यामुळे इथे कोणीच कोणावर अन्याय करायचा प्रश्न नव्हता..मकरंदच्या आग्रहाला बळी पडण्याइतकी माधवी भाबडी राहिली नव्हती किंवा फ़क्त माधवीच्या चैनी वृत्तीमुळे मकरंद असहाय्य होण्याइतका बिचारा उरला नव्हता. आंतरजातीय विवाह केला असला तरी दोघांची गरजेची जात एकच होती......"

चाहूलला विचारले गेलेले प्रश्न .... आणि लेखकाने दिलेली उत्तरे...

१. बॊस आला असता तर संघर्ष अधिक गडद झाला असता...
बॊसनं प्रश्न विचारणं फ़क्त एक निमित्त आहे..असा एखादा नैतिक प्रश्न अंगावर कोसळल्यावर वैचारिक बैठक पक्की नसेल तर चांगले वाईट ठरवायला आपण कसे असमर्थ ठरतो, कोणती भावनिक , नैतिक आणि बौद्धिक उलथापालथ होते त्याचं हे नाटक आहे...त्यात बॊस येतोच कुठे? आणि बॊस आला असत तर सगळा दोष त्याच्यावर ढकलण्याचा धोका होताच...
२. त्यांच्याकडे एवढी सुबत्ता असताना ह्या तडजोडीची गरजच का वाटावी?फ़ारच भाबडा प्रश्न झाला...फ़क्त गरीबच तडजोड करतात का? मग चंगळवादाचा जन्मच झाला नसता...
३.शेवट नकारात्मकच का?तिनं जायला नको होतं...नाटकानं एकतर मनोरंजन करावं किंवा प्रबोधन ..ही एक परंपरागत अपेक्षा आहे त्यामुळे नाटकाचा शेवट हे लेखकाचं मत मानलं जातं, यातून माधवीच्या जाण्याचं आम्ही समर्थन करतोय अशी गल्लत काही जण करून बसतात..उलट तिचं जाणं आम्हाला जास्त क्लेशदायक होतं..
आणि समजा असा एंड दाखवणं टाळलं असतं तर " चला कितीही भांडले तरी शेवट गोड झाला " असं मानत परिस्थितीतल्या कडवटपणाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झाले असते...
४.एका रात्रीत, इतक्या कमी वेळात हा निर्णय कसा घेतला जाईल?ढासळण्याची प्रक्रिया फ़ार आधीपासूनच सुरू आहे,नकाराची शक्ती शोषून घेणारं एक मिंधेपण कधीच घरात शिरलं आहे... त्यामुळं हासाचा कालखंड लक्षात घेतला पाहिजे..
५. समस्या मांडणं पुरे झालं ..त्यावरचे उपाय सांगा ना...परिस्थितीचं निदान करणं त्यावर रोखठोक भाष्य करणं माझं कर्तव्य आहे... उपाय ज्यानं त्यानं आपापल्या ग्रहणशक्तीनुसार शोधायचा आहे..
चाहूल बघताना मकरंद माधवीच्या थरापर्यंत जाण्यापूर्वीच स्वत:ला थांबवावंसं वाटलं,आपल्या आयुष्यातल्या तडजोडी आठवून शरमल्यासारखं झालं, मनात काही खूणगाठ बांधावीशी वाटली, ऒफ़िसला एखादं खोटं बिल लावताना, एखादा काळा व्यवहार करताना मन थोडं जरी कचरलं तर त्याहून अधिक फ़लित चाहूलचं दुसरं काय असणार?कारण आज स्वत:ची स्वत:लाच लाज वाटणंयापेक्षा अधिक कोणती जागृती असू शकणार? नकारात्मक शेवट केल्याशिवाय ही सकारात्मक लाज येणार कुठून?
__________________________________________________________-

काही काळानंतर " कळा या लागल्या जीवा " नावाचे नाटक आले होते ... (प्रयोग छानच होता मी सुबोध भावे आणि शृजा प्रभुदेसाई यांनी केलेला प्रयोग पाहिला..... )
एका मित्राने सांगितले की त्याच्या लेखकाने चाहूलवर चिडून त्याला उत्तर देण्यासाठी हे नाटक लिहिले.... मी मोठ्या आशेने हे नाटक पहायला गेलो...( पण फरक इतकाच
१. चर्चेच्या वेळी दोघे दारू पीत नाहीत
२. ती त्याला सोडून जात नाही..शेवट गोड ...) बाकी सारे नाटक तेच्...मग एवढे मोठे नाटक परत लिहायचे कशाला?? असो.. तेही नाटक छान चालले , चालते आहे...

1 comment:

अभिजित पेंढारकर said...

मी `चाहूल' पाहिलं नाही. पण मी प्रशांत दळवींचा चाहता आहे. `ध्यानीमनी' पाहिलंय?

`कळा या लागल्या जीवा` मी पाहिलं. पण एवढं आवडलं नाही. आक्रस्ताळी आणि थोडं कंटाळवाणं वाटलं.