Saturday, June 21, 2008

लूज कंट्रोल...दीर्घांक ... एक परीक्षण / अनुभव

लूज कंट्रोल...

२००५ च्या सुदर्शन रंगमंचावर महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारं नाटक..

लेखक : हेमंत ढोमे
दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी
कलाकार : अमेय वाघ,हेमंत ढोमे,निपुण धर्माधिकारी, सुषमा देशपांडे
निर्मिती : समन्वय पुणे.

या नाटकाचा दीर्घांक मी जुलै २००६ मध्ये पाहिला. त्याचे नंतर दोन अंकी नाटक आले, पण ते जास्त काळ टिकले नाही. ते नाटक मी पाहिले नाही.मी आत्ता बोलणार आहे ते दीर्घांकाविषयी..

नाटकाचे कथासूत्र...
तीन कॉलेज मधले मित्र. वय वर्षे १९ - २०... त्यातल्या एकाचे आईवडील बाहेरगावी गेलेले असल्याने धिंगाणा करायला उरलेले दोघे मित्र त्याच्या घरी राहायला आले आहेत. नाटक सुरू होताना एक जण खिडकीतून समोरच्या बिल्डिंगमधलं तरूण जोडपं प्रेमचेष्टा करताना दिसतंय का ते पाहण्याच्या प्रयत्नात... पण ते जोडपं शॉपिंगला बाहेर गेलंय, परत आल्यावर लक्ष ठेवू, वगैरे संवाद होतो... नंतर संवादाची गाडी एकूणच आसपासची वाढती कामुक आव्हाने, सिनेमा नट्या, जगाच्या मानाने आपण किती मागे आहोत ( फ़िनलंडमधल्या तरूणांचे सेक्सच्या पहिल्या अनुभवाचे सरासरी वय आहे १९ बर्षे... आणि आपण तिच्यायला असे"!!!)..अजून लग्नाला इतका अवकाश अहे आणि आपण तोपर्यंत .... वगैरे वगैरे मार्गाने जात असताना तिघांचे एकमत होते की आपण हा अनुभव आता घेतलाच पाहिजे.
त्यातल्या एकाचा एक अनुभवी (!) मित्र एका "व्यावसायिक" PSW ला ओळखत असतो, त्याला फोन करून हे (हो नाही करत, स्वत:जवळ पुरेसे पैसे आहेत का बघत ) तिची अपोइंटमेंट घेऊनही टाकतात. ... मग असे करू, तसे करू वगैरे खूप अंदाज आणि ती येते...
( या सार्‍यांची अपेक्षा की एखादी कॉलेजकन्यका येईल... पण येते एक मध्यमवयीन स्त्री).. मग सगळे गांगरून जातात आणि काहीही न करता तिच्याबरोबर सीडीवर इक्बाल सिनेमा पाहतात, आणि तिला पैसे देऊन निरोप देतात.....
....
मग पुन्हा एकाला समोरच्या इमारतीत त्या फ़्लॆटमध्ये लाईट दिसतो .." ते जोडपं आलंय परत... " ... "बघावं काय?" असा विचार करत दोघे उठतात पण "नकोच ते" असं म्हणत परत झोपतात..
पडदा ...संपलं नाटक..
______________________________________
माझे मत : आपल्याला नाटक पाहताना आवडलं ...
औटस्टेंडिंग, विचारप्रवर्तक वगैरे नव्हते तरीसुद्धा त्यात गंमत होती.. कलाकारांनी छान कामे केली होती... सुरुवातीच्या सेक्सबद्दलच्या कुतुहलाचे संवाद छान लिहिले होते... काही क्षणी नाटक अगदीच चीप होतंय की काय अशी मला भीती निर्माण होता होता परत कंट्रोल व्हायचे. ... हे निपुणमधल्या दिग्दर्शकाचे कौशल्य ... ( हे असले संवाद मी लिहू शकलो नसतो , हे ही खरे) पण आता नाटकाचा विषयच हा आहे तर काय करणार ? (आता इतकी नैसर्गिक गोष्ट आहे ही, पण पूर्वी तर त्याबद्दल कुठेच बोलायचे नाही, चर्चा नाही,
अर्धवट माहिती इकडून तिकडून मिळवलेली .. आताच्या तरूण मंडळींकडे आंतरजालासारखा माहिती स्त्रोत आहे हे बरे....)

मला वाटतं मी हे नाटक सुमारे १२५ लोकांबरोबर पाहिलं... त्यात साधारणपणे ३ ग्रुप दिसले.
त्यात एक ग्रुप - पुढे बसून जोराजोरात खिदळणारे, प्रचंद दाद देणारे अगदी २० २२ वर्षांचे कॊलेजियन... कारण हे सारे अगदी त्यांच्या मनातले , त्यांच्याच वयाची पोरे सांगताना दिसताहेत.
दुसरा ग्रुप ... ( माझ्यासारखा ) तीस पस्तीसच्या आसपासचा , त्यातल्या एका मित्राशी बोललो , तो डोळे मिचकावत म्हणाला, " कुतुहल, अंदाज, आनंद वगैरे त्या त्या वयात ठीक आहे पण शेवटी यांनाही कळेलच की नंतर की ...म्हणजे ...वाटतं तेवढं ...हं... " आणि मान हलवत हसला.
तिसरा ग्रुप ... पन्नास- पंचावन्नचा ज्यांची मुले मुली वीशीत आहेत असे... यांचे चेहरे थोडे चिंताग्रस्त दिसले.... काही स्त्रिया तर वैतागलेल्या दिसल्या... ( हे काय घाणेरडं वगैरे? घरात वेश्या बोलावताय?")

मला तर पुण्यातल्या शनिवार पेठेत आपण हा प्रयोग पाहिला, यावर थोडा वेळ विश्वास बसेना....
प्रयोग नाटकाच्या विषयाशी प्रामाणिक होता? हो.
बहुसंख्य प्रेक्षकांनी एन्जॊय केला? हो.
कलाकारांची कामे मस्त.... आधी मारे वाघासारखी गप्पा मारणारी पोरं ती आल्यानंतर शेळी होतात ते बेष्ट...
________________________
( आता दुसर्या बाजूने विचार केल्यावर वाटतं , समजा तिथे खरंच कॊलेजची १८ वर्षांची PSW आली असती तर काय झाल असतं? मध्यमवयीन स्त्री येणं आणि यांनी काहीच न करणं , ही नाटककाराच्या दृष्टीनं एक पळवाट झाली की सांगायला, " बघा माझी पात्रे वाईट नाहीत हो, काहीही न करता त्यांनी फ़क्त सिनेमा पाहिला"... मग एवढंच करायचं होतं तर इतक्या धीट विषयाला हात घालून ऐन वेळी पळवाट कशाला काढली ? तिथे खरी मजा आली असती की आलेली १८ वर्षांची मुलगी यातल्या एकाची मानलेली गर्लफ़्रेंड आहे.... मग खरी मजा आली असती...मग यांची बोलती बंद झाली असती, "तुम्ही मुलं जर तिला बोलवू शकता तर त्याच न्यायाने मी ती असू का नये??"
असा एक संवाद लिहून पाहू म्हणतो, सराव म्हणून...

कुत्रा आणि मी ... काही अनुभव...



".... कुत्रा घराची आणि शेताची राखण करतो.प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून धन्याचे प्राण वाचवतो, असा हा इमानी प्राणी मला खूप आवडतो...." वगैरे वगैरे वगैरे.. हे असलं मी शाळेतल्या निबंधात अनेक वेळा लिहिलं आहे , यातला बराचसा भाग खरा असला तरी कुत्रा प्राण्याचं ते फ़ार एकांगी आणि फ़िल्मी वर्णन असतं... आता मी जे पुढं लिहिलंय त्या आहेत निबंधात न लिहिता येण्यासारख्या गोष्टी..

काही मंडळींना भटक्या कुत्र्यांबद्दल भन्नाट प्रेम असतं..पण त्यांना पहाटे सायकलवरून कामावर जायचं नसतं, किंवा रात्रपाळीवरून परत येताना मागे लागलेल्या कुत्र्यांमुळं खड्ड्यात पडावं लागलेलं नसतं..किंवा पोटावर इन्जेक्शनाची नक्शी काढून घ्यावी लागलेली नसते.... भटक्या कुत्र्यांचा त्रास शक्य ते उपाय वापरून बंद केला पाहिजे असं खुद्द अहिंसावादी गांधीजींनीही म्हटलं होतं म्हणे...हे तर भटक्या कुत्र्यांचं झालं ..पाळीव कुत्रे तरी काय सारे नियंत्रणात असतात काय??

हे सारं इथे आठवण्याचं कारण म्हणजे कालच मी एका ओळखीच्या गृहस्थांकडे गेलो असताना त्यांनी पाळलेल्या एका जर्मन शेफर्ड जातीच्या रॉकी नामक लाडक्या कुत्र्याने माझ्यावर हल्ला केला...हो, हो, मी हल्लाच म्हणणार.. कुत्रा पाळणार्‍यांनी म्हणावं की " रॉकी जरासा चिडला असेल इतकंच"... आता कोणी म्हणेल,", तुम्ही कशाला त्याची खोड काढायला गेलात? "... खरं सांगतो, " आपण काहीच केलं नाही..." आता त्या अक्षरश: वाघासारख्या प्राण्याची खोडी काढण्याइतके आम्ही निर्बुद्ध नाही हो.....

त्या रॉकीला असा अंगणात मोकळा सोडलेला..घराला साडेपाच फ़ुटी उंच भिंत आणि लोखंडी गेट....मी गेटच्या बाहेरून बेल वाजवली आणि गेटपाशी उभा राहिलो, ते काही रॊकीला पसंत पडले नसावे... त्याने माझ्या दिशेने गुरकावून उडी मारायला सुरुवात केली, त्याचे पंजे चांगले माझ्या डोक्याच्याही वर जाणारे...त्याचा तो थयथयाट पाहूनही मी काही घाबरलो नाही, मध्ये भक्कम लोखंडी गेट होते ना...मी शांत उभा राहिलो...मग त्याने भुंकायला सुरुवत केली... मग घरातून काही लोक आले , त्याला घेऊन आत गेले, गेटच्या बाहेरूनच माझ्याशी बोलले ,

माझे काम झाले, मी जाणार तेवढ्यात घराच्या आतून सुसाट वेगाने रॊकी माझ्या दिशेने भुंकत आला, मी बाहेर जायला चालायला सुरुवात केली होती, पण त्याने भिंतीवर उडी मारली, आणि ज्या क्षणी माझ्या लक्षात आले की रॉकीच्या क्षमतेसाठी ही भिंत अपुरी आहे, आणि उडी मारून तो पलिकडे येणार, त्यावेळी मात्र माझे धाबे दणाणले, आसपास कोणी नाही... घरातल्यांच्या तोंडी सूचनेला रॊकी आवरत नाही हे दिसतच होते...रस्त्यातच हा रॊकी नावाचा वाघ आपल्याला फाडून खाणार असे मला दिसायला लागले..... पुढे काय झाले नीट आठवत नाही, मी भीतीने हंबरडा फोडला की तोंडातून आवाजच फ़ुटला नाही ते आठवतच नाही..धावण्याचा क्षीण प्रयत्न केला असावा,..कोणत्याही क्षणी आपल्या परमप्रिय शरीराचा लचका एक हिंस्त्र प्राणी तोडणार आहे, हे फीलिंग फार भयानक असतं खरं...मला शेजारच्या रो हाउसची भिंत वर चढून पार करावीशी वाटली... मी तिकडे धावून पलिकडे उडी मारली की काय केले आठवत नाही, आजूबाजूला आरडाओरडा झाला थोडासा..

रॉकीचे शेजारी त्यांच्या अंगणात खुर्ची घेऊन पेपर वाचत बसले होते , तेही ओरडू लागले...त्यांनी माझ्या दिशेने प्लास्टिकची खुर्ची फ़ेकली , आणि हातात धरून उभे रहा अशी सूचना केली...दोन चार सेकंदच गेली असतील मध्ये.. भानावर आलो तेव्हा मी दोन घरे पलिकडच्या भिंतीच्या आत खुर्ची धरून उभा होतो,.. तेव्हाही त्या खुर्चीचा फ़ार आधार वाटला हे खरं... तिथे कसा पोचलो ते काही आठवत नाही...( सिंहाच्या पिंजर्यात लाईट गेल्यानंतर दामू धोत्रे हे रिंगमास्टर असेच हातात स्टूल धरून उभे असतील या कल्पनेने मला आत्ता हसू येतेय.. आठवला तिसरीतला "प्रकाश प्रकाश " हा धडा")..मधल्या काळात रॉकीला आत नेले असावे मालकाने... चार क्षण दम खाल्ला, देवाचे आभार मानले... पायात जोरात कळ गेली...कुठेतरी उडी मारायच्या प्रयत्नात मी पडलो असणार , पायाला बरंच खरचटलं होतं, आणि मुका मार थोडासा...पाय ठणकत होता... हे अगदीच थोडक्यात भागलं.. पण भीतीनं मी थरथरत असणार.. .. माझी अवस्था पाहून शेजार्‍यांनी ग्लासभर पाणी आणून दिले, त्यांच्यासाठी हे प्रसंग नित्याचे असावेत...त्यांना माझी दया वगैरे आली असावी... मला बसा म्हणाले पाच मिनिटे... रॉकीच्या शेजारच्या घरात अजून थांबायची माझी इच्छा नव्हती, .. मी दुखर्‍या पायाने रॉकी मागे येत नाही ना हे पाहत पाहत , शक्य तितक्या वेगाने तिथून सटकलो... दुपारी रस्त्यावर गर्दी नव्हती, खरंतर कोणीच नव्हते...त्यामुळे आपल्या शेजारचा दातांचा डॉक्टर कुत्र्याला घाबरून खड्ड्यात पडला असा विनोदी प्रसंग लोकांनी मिस केला ...
या सार्‍यात रॉकीची चूक नाहीच पण त्याच्या मालकांची काही चूक आहे की नाही, असलीच तर किती ? हे ही मला माहित नाही...

लहानपणापासून माझं कुत्र्याशी फ़ार जमलं नाहीच... दुसरीत कोल्हापुरात एक पामेरियन कुत्रा चावला तेव्हा एक टिटॆनसच्या इन्जेक्शनावर भागलं... आठवीत पुन्हा पामेरियनच चावलं तेव्हा महापालिकेच्या दवाखान्यात जाऊन पोटावर रेबीजची तीन इन्जेक्शनं घेतली होती.. आणि काही कारण नसताना कालचा जर्मन शेफर्ड....माझं नशीब थोर की तो चावला नाही...त्यामुळं मला कुत्र्यांविषयी कधीच प्रेम वगैरे वाटलं नाही.. हा प्राणी आपल्याला चावू नये इतपत माफ़क अपेक्षा मी करत असे..

आमच्या घरी एक पाळलेली मांजरी होती...आईला फ़ार आवडत असे..पण ही मांजरी कोणत्याही उचकवण्याशिवाय मी अगदी पाठमोरा उभा असताना सुद्धा मला येऊन बोचकारत असे.
( मात्र त्याच मांजराच्या पिलांशी तासंतास खेळायला मात्र मजा येत असे)..

आमचे शेजारी गावठी कुत्रे पाळत असत.,.. त्यांच्या कुत्र्याशी मी फ़ार शत्रुत्त्व नाही किंवा फ़ार प्रेम नाही अशा पद्धतीने अंतर राखूनच वागत असे...पण तो कुत्रा रस्त्याने जाणार्‍या येणार्‍यांवर धावून जात असे,सायकलवाल्यांना घाबरवत असे, पाडत असे, त्यावेळी फ़िदी फ़िदी हसत गंमत पाहणार्‍या आपल्या मुलांना ते थाबवत तर नसतच पण कौतुकमिश्रीत उत्साहाने ," ...अग्गोबाई, आमच्या पिंटूने / मोत्याने / काळूने आस्सं केलं हो "..अशी चर्चा करत असत. मात्र कुत्र्यांना बांधणे त्यांना पसंत नसे.... अंगावर उड्या मारमारून भुंकणार्‍या कुत्र्याला पाहून कोणी येणारा सज्जन घाबरला तर म्हणत असत," काही करत नाही हो आमचा कुत्रा, उगीच घाबरू नका ".. मला हे फ़ार खटकत असे " काही करत नाही काय? चावणारच तो आता,म्हटल्यावर लोकांना भीती वाटणारच...उगीच कोण घाबरेल ?..." असं त्यांना सांगावंसं वाटत असे..पण मी फ़ार लहान असल्याने त्या वेळी काही बोलू शकत नव्हतो......

शाळेत असताना हक्क आणि कर्तव्ये नावाचा नागरिकशास्त्रात एक धडा होता...त्याला स्मरून सर्व प्राण्यांच्या मालकांना एक सांगावेसे वाटते,
कुत्रा (, माकड , वाघ, सिंह, हत्ती, कासव, ससा, जिराफ़ ,तरस, लांडगा, सुसर) काय वाट्टेल ते पाळा हो, पण आपले प्राणी बांधून ठेवा , नियंत्रणात ठेवा..

Sunday, June 15, 2008

पुस्तकाची ओळख... "असे पेशंट , अशी प्रॅक्टीस...".. लेखक : डॉ : प्रफुल्ल दाढे







पुस्तकाचे नाव... : असे पेशंट, अशी प्रॅक्टिस आणि ऍलर्जी एक इष्टापत्ती
प्रकाशक : अक्षयविद्या प्रकाशन
पृष्ठे : १६०
मूल्य : १२५ रु.
लेखक डॉ : प्रफुल्ल दाढे

लेखक एम.बी.बी.एस. आहेत ...ते अडतीस वर्षे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असून त्यांनी दोन वर्षे सरकारी नोकरी केली आणि नंतर स्वतंत्र व्यवसाय चालू केला.
हे पुस्तक म्हणजे व्यवसाय करताना डॉक्टरांना आलेल्या पेशंटची स्वभाववैशिष्ट्ये दाखवणारं अनेक भल्याबुर्‍या काही विनोदी अनुभवांचे एकत्रीकरण आहे... हे पुस्तक अत्यंत सरळ मनाने लिहिले आहे, कोणताही अभिनिवेश नाही..त्यांना कोणालाही चुकीचे किंवा बरोबर ठरवायचे नाही,आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत... डॉक्टर तेवढे चांगले आणि पेशंट वाईट असा कोणताही (ओव्हर जनरलायझेशन करणारा) पवित्रा नाही..

सुरुवातीच्या दोन वर्षांच्या काळात डॉक्टरांनी छोट्या गावामध्ये नोकरी केली.. तिथे पिण्याच्या पाण्याची कमतरता, अस्वच्छ पाणी ( त्यातून नारूची भीती),गरीबी , ( गावात अजिबात दूध न मिळणे),अन्धश्रद्धा, ( भगत मंडळींचा सर्पदंशावर उपयोग)... ... गावात स्वच्छतागृह नसल्या्ने प्रातर्विधीला डॉक्टरांबरोबर पहाटे पाचच्या बॅचला (!!!) जाऊन शेजारीच बसून कन्सल्टिंग (!!!!) मागणार्‍या पेशंटचे किस्से अफ़लातून ..
रूरल हॊस्पिटलमधून अंथरूण- पांघरूणासकट पळून गेलेले विषबाधेचे पेशंट किंवा नसबंदीच्या गाडीला पाहून पळून जाणारे पेशंट असले अनेक किस्से आहेत..... कोटा पूर्ण करायच्या नादात निष्काळजीपणे नसबंदी केलेल्या केसेस फ़ेल गेल्यानंतर नवर्‍याने संशय घेतल्याने सार्‍या कुटुंबाची वाताहत होण्याची गोष्ट ऐकून फ़ार वाईटही वाटले..

पुढे स्वतंत्र व्यवसाय चालू केल्यानंतर त्यांना शहरी नमुने भेटले...यात मद्रासी, गुजराती,कच्छी, यूपीवाले भैये यांची निरनिराळी स्वभाववैशिष्ट्ये दर्शवणार्‍यागोष्टी आहेत. इंग्रजी शब्द पेरून अर्थाचा अनर्थ करणारे पेशंट, स्थळाच्या चौकशीच्या नसत्या कटकटीत अडकवणारे पेशंट, नंबर चुकवून मध्ये घुसणारे, खोटे कौतुक करून उधारी मागणारे, व्हिजिटला पळवणारे आणि फ़ी बुडवणारे पशंट, न्हाव्याने डॉक्टरांनी माझी दाढी केली असे अभिमानाने सांगणे असे अनेक किस्से आहेत..

त्यातल्या काही गोष्टी अगदी मनाला भिडणार्‍या आहेत. स्वत:च्या नवर्‍याच्या शून्य स्पर्म काउंटची गोष्ट वृद्ध सासू सासर्‍यांना कळून त्यांच्यावर मानसिक आघात होऊ नये म्हणून नवर्‍याला विश्वासात घेऊन प्रेग्नन्सी फ़ेक करून माहेरी जाऊन मूल ऍडॉप्ट करून आणणार्या जिद्दी स्त्रीची एक गोष्ट आहे...

त्यांचा दवाखाना रस्ता रुंदीकरणात जात असताना समोरच जागा घेण्यासाठी डिपॊझिटसाठी आर्थिक मदत देणार्‍या व्यापारी शेजार्‍यांची कथा आहे. (अजून माणुसकी आहे हे खरं..)

एकूणच बदललेला जमाना, बदलता डॉक्टरी व्यवसाय , अस्ताला गेलेली फ़ॆमिली डॉक्टर ही संकल्पना, फ़ास्टमफास्ट रिझ्ल्ट्सचा पेशंट्सचा आग्रह, त्यातून अधिकाधिक हायर ऎन्टिबायोटिक्स्चा वाढता वापर, त्यातून उद्भवलेला रेझिस्टन्सचा प्रॊब्लेम, CPA आणि डोक्टर आणि पेशंट यांचा एकमेकांवरचा वाढता संशय मग त्यामुळे अधिकाधिक टेस्ट्स करून घेणे यावर डोक्टरांचे चांगले भाष्य आहे..

शेवटच्या प्रकरणात त्यांना पुण्यात झालेला गाजरगवताच्या सीव्हिअर ऍलर्जीचा त्रास आणि त्यामुळे चांगली चालणारी प्रॅक्टीस सोडून डोंबिवलीला स्थलांतर करावे लागले परंतु ही घटना नंतर कशी इष्टापत्ती ठरली याचे वर्णन आहे... एकूणच पुस्तक वाचनीय आहे.. विविध किस्से असे पुस्तकाचे स्वरूप असल्याने कुठूनही पान उघडून वाचता येते... (सतत प्रश्न विचारणार्‍या पेशंटला डॉक्टरांनी दिलेली कंटाळून दिलेली उत्तरे आणि त्यातून निर्माण झालेला एक विनोद या पुस्तकात लिहिलेला आहे, तो अगदी एक नंबर आहे... मी तो वाचून बराच काळ हसत होतो..)...पुस्तकातील रेखाटने, छपाईचा दर्जा छान आहे...पुस्तक जरूर वाचा...

Sunday, June 8, 2008

पेशंटच्या नजरेतून रूट कॆनाल ट्रीटमेंट

फस्स...
कसलासा कडवट स्प्रे हिरड्यांवर आणि
वर आश्वासन " हे तर दुखणारच नाहीये"..
... मग डोळ्यांसमोर ती सुई नाचवत गोड हसणारा
तो माझा दु:खहर्ता...
गप्कन डोळेच मिटताना एक थंड सुईचा स्पर्श गाल आणि हिरडीच्या मध्ये
... मग खच्चून बोंबलताना
पुन्हा एकदा अनुभूती...
" साली झक मारली आणि इथे आलो"...
...आलेल्या मुंग्या , फुगलेला गाल, आणि ड्रिलची घरघर...
...देवा हे कधी संपणार ?...मला जीभ आहे का?
... घरघर घरघर पुन्हा पुन्हा घरघर.....विचित्र..डोकं बधीर...
छोट्या सुया, मोठ्या सुया..सतत खरवड आणि
सारखं "आ करा आ करा .."
... बरोबर
...मग सुया घालून एक्स रे...
फिल्म आत ..डोकं वर, मान खाली....
बीईईईईईप.....
एक्स रे...
..मग पुन्हा घरघर आणि खरवड...

"झालंच हां आता" चा जप..
कशाला खोटं बोलतो साल्या?..हे मनात...

मग कसल्याशा मशीनची बीपबीप...
ऍडव्हान्स्ड डेन्टिस्ट्रीच्या नानाची टांग...
फस्स... एक कडवट औषधाचा फवारा दातात, मग त्याच त्या गुळण्या...
.."हळू..."...
...
..झक मारली आणि आलो.
...हे कितव्यांदा...
मग एक पांढरं मातीसारखं ढेकूळ ...
दातात थापलेलं...
"झालं..."
छान....
... डोकं हलकं एकदम ...
अन खिसाही...

______________________________

आमच्या घरातून दिसणारा सिंहगड...आणि वर जाताजाता ... छायाचित्रे...










मी सिंहगडापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर राहतो... नेहमीच दिसत नाही सिंहगड घरातून.... ती मागची डोंगराची रांग बर्‍याचदा ढगाच्या पडद्या आड असते...
पण कधीतरी दिसतो.... पाऊस पडून गेल्यावर अधिक छान वाटतो......
सिंहगड ओळखायची सोपी खूण म्हणजे टीव्ही टॉवर...त्या नारळाच्या झाडाच्या वरतीच डाव्या बाजूला गडावरच्या पार्किंगच्या वरच्या कड्याच्या दोन पायर्‍या आणि त्याच्यावर तो टीव्हीचा टॉवर...
गडाच्या मध्यभागी सुद्धा अजून एक टॉवर आहे....हे दोन्ही टॉवर या फोटोत दिसत आहेत...

पुढचे दोन फोटो गडाकडे जाताजाता रस्त्यावरती काढलेले आहेत..

शेवटचा फोटो...हा मोटारीच्या रस्त्याने वर जाताना ....
भरून आलेलं आभाळ... ते दोन टॉवर... आणि बारकाईने पाहिलं तर खच्चून गर्दी दिसतेय रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची.......

चाहूल... ...नाटक... १९९८

चाहूल

चंद्रलेखा प्रकाशित
चिरंतन निर्मित

दोन अंकी नाटक... चाहूल..

लेखक : प्रशांत दळवी
दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी
कलाकार : तुषार दळवी
सोनाली कुलकर्णी

कथासूत्र :
मकरंद आणि माधवी या तथाकथित आधुनिक, शहरी जोडप्याची एका रात्रीत घडणारी ही गोष्ट...मकरंद ऒफ़िसमधून घरी आलाय आणि चिडचिड करतोय , नंतर त्यामागचं कारण असं कळतं की त्याच्या बॊसनं माधवीला एक रात्र त्याच्याबरोबर लोणावळ्याला पाठवण्याची विनंती केलीय...
मग एकमेकांवर दोषारोप ( तूच जास्त नटतेस वगैरे आणि ती म्हणते तिथेच त्याला ठणकावून शिव्या देऊन नकार का नाही कळवलास वगैरे)... मग चर्चेलाच तोंड फ़ुटते.... पावित्र्य म्हणजे काय?(किराणा सामान आणलेलं आहे...) त्यातल्या प्रत्येक चैनीच्या गोष्टीची ( शांपू, पावडर, बॊडी लोशन , डिओ स्प्रे वगैरे ) आपल्याला खरंच गरज आहे काय?...( मग थोडं फ़ार समर्थन सुरू होतं ) कदाचित आपली लाचारी, वाढत्या गरजा, आणि स्वप्नं त्याला दिसली होती .....सर्वच गोष्टींचं बाजारीकरण... गरज आणि चैन यातला फ़रक काय , गरज कुठे संपते आणि चैन कुठे सुरू होते??...दोघे दारू पिऊन बोलत राहतात... मग पुढेपुढे सगळे नैतिक अध:पतनाचं भाबडे, खोटे समर्थन करत करत दोघे झोपतात...... सकाळ होते, घाईघाईने आवराआवर , तयारी करत माधवी बाहेर पडते, बाहेर जाताना एवढंच विचारते " पुरेसे भांडलो ना रे आपण ?" तोही मोजकंच बोलतो ," तू नि:शंक मनाने जा... प्रामाणिकपणाची चैन परवडणारी नाहीये आपल्याला..."
ती गेल्यावर मात्र मकरंद पलंगावर कोसळतो आणि डोक्यावरून पांढरी चादर ओढून घेतो,आणि मागे सारे आकाश चिरून टाकणारा हा आवाज कसला येतोय? तो आतला आवाज तर नक्कीच नाही..
____________________-

मी हे नाटक पाहिलं त्याला आता १० वर्षं झाली... अजून तो शेवटचा सीन आणि अनंत अमेंबल यांचं शेवटचं संगीत आठवतं..... इतका परिणामकारक शेवट असलेलं अस्वस्थ करणार नाटक मी अजून पाहिलेलं नाही... मी एकटाच पहायला गेलो होतो, बरोबर कोणीच नव्हतं... अत्यंत अस्वस्थ होऊन, आत्ममग्न अवस्थेत थरथरत राहिलो होतो काही काळ... अध:पतनाचं समर्थन आपल्याला पटतंय की काय, या विचाराने चिडचिडच व्हायला लागली..हे आपलं अध:पतन म्हणायचं का नाटककाराचं यश? बराच वेळ झोप आली नाही... दुसया दिवशी मित्राला पूर्ण स्टोरी सांगितली , सर्व ग्रुप घेऊन पुन्हा ते नाटक बघायला गेलो... असं कुठे असतं का? असं कोणी करतं का ?हे नाटक आवडणारा माणूस स्वत: तरी असं करेल का? वगैरे वगैरे पुष्कळ प्रश्न मित्रांच्या चर्चेत पुढे आले...सगळ्यांची उत्तरं द्यायला मी समर्थ नव्हतोच...मी गप्प बसलो... accepting indecent proposal या घटनेपलिकडे जाऊन त्यातली चर्चा मनाला लावून घ्यायला कोणी तयार नव्हतं..
________________________

मग २००० साली पॉप्युलर प्रकाशनाने काढलेले नाटकाचे पुस्तक सापडले... त्यात संवादांपेक्षाही प्रशांत दळवी यांनी लिहितानाचे आणि नाटक स्टेजवरती आल्यानंतरचे काही अनुभव लिहिले आहेत... खास त्यासाठी हे पुस्तक घ्यायलाच पाहिजे..
त्या प्रस्तावनेतील काही खास भावलेली वाक्यं द्यायचा मोह इथे आवरत नाहीये...

"...मकरंद आणि माधवी.....स्त्रीत्त्व किंवा पुरुषत्व हे त्यांचं समसमान भागभांडवल होतं, बाकी बुद्धिमत्ता आणि अधिकाराच्या बाबतीत तर समानताच होती,त्यामुळे इथे कोणीच कोणावर अन्याय करायचा प्रश्न नव्हता..मकरंदच्या आग्रहाला बळी पडण्याइतकी माधवी भाबडी राहिली नव्हती किंवा फ़क्त माधवीच्या चैनी वृत्तीमुळे मकरंद असहाय्य होण्याइतका बिचारा उरला नव्हता. आंतरजातीय विवाह केला असला तरी दोघांची गरजेची जात एकच होती......"

चाहूलला विचारले गेलेले प्रश्न .... आणि लेखकाने दिलेली उत्तरे...

१. बॊस आला असता तर संघर्ष अधिक गडद झाला असता...
बॊसनं प्रश्न विचारणं फ़क्त एक निमित्त आहे..असा एखादा नैतिक प्रश्न अंगावर कोसळल्यावर वैचारिक बैठक पक्की नसेल तर चांगले वाईट ठरवायला आपण कसे असमर्थ ठरतो, कोणती भावनिक , नैतिक आणि बौद्धिक उलथापालथ होते त्याचं हे नाटक आहे...त्यात बॊस येतोच कुठे? आणि बॊस आला असत तर सगळा दोष त्याच्यावर ढकलण्याचा धोका होताच...
२. त्यांच्याकडे एवढी सुबत्ता असताना ह्या तडजोडीची गरजच का वाटावी?फ़ारच भाबडा प्रश्न झाला...फ़क्त गरीबच तडजोड करतात का? मग चंगळवादाचा जन्मच झाला नसता...
३.शेवट नकारात्मकच का?तिनं जायला नको होतं...नाटकानं एकतर मनोरंजन करावं किंवा प्रबोधन ..ही एक परंपरागत अपेक्षा आहे त्यामुळे नाटकाचा शेवट हे लेखकाचं मत मानलं जातं, यातून माधवीच्या जाण्याचं आम्ही समर्थन करतोय अशी गल्लत काही जण करून बसतात..उलट तिचं जाणं आम्हाला जास्त क्लेशदायक होतं..
आणि समजा असा एंड दाखवणं टाळलं असतं तर " चला कितीही भांडले तरी शेवट गोड झाला " असं मानत परिस्थितीतल्या कडवटपणाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झाले असते...
४.एका रात्रीत, इतक्या कमी वेळात हा निर्णय कसा घेतला जाईल?ढासळण्याची प्रक्रिया फ़ार आधीपासूनच सुरू आहे,नकाराची शक्ती शोषून घेणारं एक मिंधेपण कधीच घरात शिरलं आहे... त्यामुळं हासाचा कालखंड लक्षात घेतला पाहिजे..
५. समस्या मांडणं पुरे झालं ..त्यावरचे उपाय सांगा ना...परिस्थितीचं निदान करणं त्यावर रोखठोक भाष्य करणं माझं कर्तव्य आहे... उपाय ज्यानं त्यानं आपापल्या ग्रहणशक्तीनुसार शोधायचा आहे..
चाहूल बघताना मकरंद माधवीच्या थरापर्यंत जाण्यापूर्वीच स्वत:ला थांबवावंसं वाटलं,आपल्या आयुष्यातल्या तडजोडी आठवून शरमल्यासारखं झालं, मनात काही खूणगाठ बांधावीशी वाटली, ऒफ़िसला एखादं खोटं बिल लावताना, एखादा काळा व्यवहार करताना मन थोडं जरी कचरलं तर त्याहून अधिक फ़लित चाहूलचं दुसरं काय असणार?कारण आज स्वत:ची स्वत:लाच लाज वाटणंयापेक्षा अधिक कोणती जागृती असू शकणार? नकारात्मक शेवट केल्याशिवाय ही सकारात्मक लाज येणार कुठून?
__________________________________________________________-

काही काळानंतर " कळा या लागल्या जीवा " नावाचे नाटक आले होते ... (प्रयोग छानच होता मी सुबोध भावे आणि शृजा प्रभुदेसाई यांनी केलेला प्रयोग पाहिला..... )
एका मित्राने सांगितले की त्याच्या लेखकाने चाहूलवर चिडून त्याला उत्तर देण्यासाठी हे नाटक लिहिले.... मी मोठ्या आशेने हे नाटक पहायला गेलो...( पण फरक इतकाच
१. चर्चेच्या वेळी दोघे दारू पीत नाहीत
२. ती त्याला सोडून जात नाही..शेवट गोड ...) बाकी सारे नाटक तेच्...मग एवढे मोठे नाटक परत लिहायचे कशाला?? असो.. तेही नाटक छान चालले , चालते आहे...

साठेचं काय करायचं...


साठेचं काय करायचं...

लेखक : राजीव नाईक...
दिग्दर्शक संदेश कुलकर्णी
कलाकार : निखिल रत्नपारखी, अमृता सुभाष
निर्मिती :समन्वय पुणे...
( मौज प्रकाशनाच्या आताची नाटकं या नाईक यांच्या नाट्यसंग्रहात हे नाटक आहे.)
हे नाटक पाच सहा भाषांमध्ये भाषांतरित झालं...समन्वयने साठच्या आसपास प्रयोगही केले..
क्रोएशियन रंगभूमीवरही त्याचे प्रयोग झाले...

मी या नाटकाचा प्रयोग पाहू शकलो नाही तरी केवळ वाचूनही ते मला फ़ार आवडते.. ( निखिल माझा आवडता अभिनेता आहे, हे लक्षात घेतलं तर पाहिल्यानंतर अधिकच आवडेल हे निश्चित)..

या नाटकाला फ़ार मोठी सांगण्यासारखी गोष्ट अशी नाही...
अभय आणि सलमा या जोडप्याची ही गोष्ट ... अभय ऎडफ़िल्म्स बनवणारा, मिडिआमध्ये काम करणारा, थोडासा लेखक दिग्दर्शक, क्रिएटिव्ह आणि सेन्सिटिव्ह आणि सलमा कॊलेजात शिकवते, इंग्लिशची प्रोफ़ेसर.....फक्त संवादांत येणारा साठे अभयचा मित्र ( किंवा अभयच्या दृष्टीने प्रतिस्पर्धी म्हणूया हवं तर), साठे ऎवॊर्ड विनिंग डॊक्यूमेंटरीज बनवतो... आणि अभयला कुठेतरी सतत असं वाटत राहतं " आपण ऎडफ़िल्मवाले म्हणून साठे आपल्याला हिणवतो.." .. हे सगळं उगीच अभयला वाटतंय, साठेच्या हे गावीही नसणार कदाचित...अभय स्वत:ला फ़िल्ममेकर मानतो, त्याला साठेसारखं व्हायचंय पण त्याच्यासारखं यशस्वी होऊ न शकल्यामुळे तो त्याच्यावर जळतो..कंपूबाजीने आपल्यावर अन्याय केला नाहीतर कलाक्षेत्रात आपण कुठल्या कुठे पोचलो असतो असं त्याला वाटतं...पार्टीत साठेच्या होणाया कौतुकावर चिडतो आणि कंपूगिरीला शिव्या घालतो... आणि या प्रत्येक संवादात सलमा त्याला जाणीव करून देतेय की उगीचच साठेवर चिडचिड करायचं कारण नाही,, तुझे मित्र नाही तुझं कौतुक करत?..( तुमची तेवढी दोस्ती आणि त्याचा कंपू ?). एकदा साठेची फ़िल्म चालू असताना अभय दुसर्या एका मित्राला बू करायला लावतो , हे कळल्यावर पुन्हा वाद... सलमा त्याला सांगते, "तुझ्यात जेवढी टॆलंट आहे तेवढी लाव पणाला , असेलच स्पर्धा तर हेल्दी असूदे"... तरी अभयची चिडचिड चालूच...त्याची स्वप्नं म्हणजे वेल-इक्विप्ड स्टुडिओ, कादंबरी लेखन, फ़िल्म काढणे वगैरे...

अभय NFDC च्या फ़ंडिंगने एक फ़िल्म बनवू इच्छितो आणि त्यासाठी त्याची लाच वगैरे द्यायची सुद्धा तयारी आहे, हे दर्शवणारे सुंदर स्वगत आहे नाटकात..

नाटकात घडत फ़ारसं नाहीच... दहा प्रवेश आहेत नाटकात आणि बाहेर घडणाया घटनांवर दोघांच्या स्वभावानुसार रिपिटीटीव्ह त्याच त्याच प्रतिक्रिया...हे नाटक पुनरावृत्तीचं आहे, मध्ये मध्ये इतर सूर लागतातच पण मुख्य भावना परत परत येत राहतात.. पण संवाद अत्यंत छान, खटकेबाज...नाटक कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं असं फ़ारसं नाहीच...
हे झालं गोष्टीबद्दल...
दोन विरुद्ध स्वभावाच्या माणसांनी एकाच घटनेवर कशा प्रतिक्रिया द्याव्यात , आणि त्याचे संवाद कसे लिहावेत यासाठी ही संहिता अभ्यासण्यासारखी आहे... या संहितेचे पुन्हा पुन्हा वाचन करायला मला आवडते... नवनवीन काहीतरी सापडत राहते प्रत्येक वाचनात...

प्रत्येक सृजनशील माणसाचा एक साठे असतो....( मीही त्याच्याइतकाच टॆलंटेड आहे मग त्याच्यासारखं व्हावंसं वाटत असतं, त्याने आपलं कौतुक करावंसं वाटत असतं... पण त्याच्या सतत यशस्वी होण्यावर मात्र मनात असूया दाटत असते)..मलाही असं क्वचित कधी होतं , तेव्हा मात्र मी हे नाटक आठवून ही भावना बरीच कमी करण्यात यशस्वी होतो...
आणि या उलट कळत नकळत आपण स्वत: क्वचित कोणाचे साठे असू शकतो ... लेखकाने स्वत: लिहिलंय की सुरुवाती-सुरुवातीला त्याला स्वत:ला साठेशी जास्त आयडेन्टिफ़ाय करावंसं वाटलं होतं...

..
राजीव नाईक यांनी या पुस्तकाच्या शेवटी हे नाटक सुचताना काय मनात होतं त्याबद्दल लिहिलं आहे...त्यातल्या काही ओळी देतो इथे...
" आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?"..

सध्या तरी नाटक स्टेजवर नाही, पण याचे निदान पुस्तक आवर्जून वाचावे असे आमचे सर्व नाटकवाल्यांना आणि लेखक मंडळींना सांगणे आहे...

बाकी शून्य ...कादंबरी परीक्षण

जय सरदेसाई नावाच्या सांगलीतल्या एका हुशार , संवेदनशील माणसाची शाळेपासून ( १९७० ते १९८६) इंजिनियर होईपर्यंत...मग पुढे आयुष्यातील एक से एक वळणांची ही एक बरीचशी इण्ट्रेष्टिंग गोष्ट...( लेखक कमलेश वालावलकर ,राजहंस प्रकाशन ,पृष्ठे ४२५, किंमत १७० रु.)

जयची शाळा, मित्र, अभ्यासातली हुशारी, दहावी बोर्डात येणे, खच्चून अभ्यास, बी ई करताना नाटकाचा नाद लागणे, लेखनाचा छंद, सिनेमात जायचा निश्चय, डीग्री घेतल्यानंतर मराठी सिनेमात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम,पुण्यामध्ये फिल्म बनवणे शिकायसाठी आगमन, पार्टटाईम पत्रकारिता, दिल्लीची बिनधास्त पत्रकार मैत्रीण, नाशिकमधल्या एका कंपनीत मार्केटिंगचा जॉब, पगार वाढत जात असतानासुद्धा काहीतरी करून दाखवण्यासाठी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी नोकरी सोडून अभ्यास चालू, मग तिथले मुंबईतल्या हॉस्टेलचे ,मित्रांचे खच्चून अनुभव...आय ए एस व्हायचा अभ्यास म्हणजे वेड्यासारखा १८-१८ तास अभ्यास , इतिहास,-तत्त्वज्ञान- शास्त्र एकदम तपशीलवार, मग कसल्या तरी विचित्र कारणानं नैराश्य, भयंकर दारू पिणे, प्रचंड सिगरेट, एकूणच सगळ्याचा काही उपयोग नाही असा साक्षात्कार, कशालाच काही अर्थ नाही छापाचे प्रचंड म्हणजे प्रचंड नैराश्य, वैफल्य आणि विचित्र अधोगती...मग काय वाट्टेल ते...

ही कादंबरी सॉलिड चक्रम आहे...एंटरटेनिन्ग आहे,प्रश्न पाडते.. तत्त्वज्ञानाचा कीस पाडते अधून मधून...
नायक हॉस्टेल मध्ये एकटा वगैरे असला की त्याला हे नेहमी पडणारे प्रश्न , मग मित्रांबरोबर चर्चा.... ...--- मी कोण आहे? कसा आहे?जगणं म्हणजे काय? तुझ्या माझ्या अस्तित्त्वाचं प्रयोजन काय?या सगळ्याचा अर्थ काय? वगैरे वगैरे... मग नील्स बोहर, श्रोडिंजर, आईनस्टाईन लोकांची मदत घेऊन आणि तत्त्वज्ञान वापरून प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न आणि मग पुन्हा कशालाच अर्थ नाही, असा निष्कर्ष...कादंबरीत अशा स्टाईलची वर्णनं वारंवार येतात....

...विविध स्त्रीव्यक्तिरेखा झकास जमवल्या आहेत विशेषतः पत्रकार स्त्री....अधूनमधून ( वाचकाच्या भुवया उंचावणारी आणि मराठीत क्वचित दिसणारी ) पेरलेली सेक्स वर्णने ही आहेत... प्रेमभंगाचे दु:ख आणि दारू सिगरेट व्यसन यांच्या परस्परसंबंधाबाबत किंवा आत्महत्या आणि एकूणच मानसिक विकृती यावरही काही चिंतने आहेत...

कादंबरीचे बरेच नाव ऐकले होते.....कोसला पार्ट टू वगैरे कौतुक (?) ऐकले होते....खूपच अपेक्षा निर्माण झाल्या होत्या...वाचताना अर्थात बराच काळ या अपेक्षा टिकवून धरल्या कादंबरीने...
कोसला जरीला सारख्या नेमाडपंती लेखनाची आठवण पुष्कळ वेळा होते आणि वाचताना मजासुद्धा येते..... ( पण आपल्याला वाचताना निव्वळ स्टाईलची कॉपी म्हणून आवडतंय की कसे? तसे आवडावे का? :< हं..शेवटी कशालाच अर्थ नाही, असा निष्कर्ष...)/.. असो..
शेवटी शेवटी मात्र वैफल्यग्रस्त , नैराश्यग्रस्त नायकाची भलतीच वाहवत गेलेली गोष्ट अजिबात आवडली नाही...एवढा वेळ का हे वाचले, असे वाटले...( मग पुन्हा कशालाच अर्थ नाही, असा निष्कर्ष... )

विजय तेंडुलकर लेखन कार्यशाळा...






२००५ च्या डिसेंबरात पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फ़े नाट्य लेखन कार्यशाळा होणार असे जाहीर झाले आणि स्वत: तेंडुलकर त्यात निवडक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असे जेव्हा कळले तेव्हा आपले स्क्रिप्ट तरी पाठवून देऊ, पुढचे पुढे बघू, या विचाराने एक एकांकिका पाठवून दिली आणि विसरून गेलो ... मे २००६ मध्ये लेखन कार्यशाळेसाठी माझी निवड झाल्याचे कळले. चार दिवस तेंडुलकरांचे मार्गदर्शन लाभणार या कल्पनेनेच एकदम तरंगल्यासारखे वाटत होते... या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून सुमारे ८० संहिता आल्या होत्या आणि त्यामधून १६ लेखकांची निवड झाली होती...
२० मे ते २४ मे २००६... या गोष्टीला बरोबर दोन वर्षे पूर्ण होत आहेत आणि तेंडुलकरांच्या दु:खद निधनाची बातमी समजली.
या कार्यशाळेदरम्यान तेंडुलकरांच्या पायाशी बसून काही शिकायची संधी मिळाली याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो...

त्यातल्याच काही आठवणी...
या कार्यशाळेसाठी मुंबई,पुणे बरोबरच सोलापूर, रायगड, नगर , औरंगाबाद, लातूर या ठिकाणांहून लेखक सहभागी झाले होते...
पहिल्याच दिवशी सर्वांची ओळख करून घेताना त्यांनी " तुम्ही सारे का लिहिता किंवा तुम्हाला पहिल्यांदा नाटक का लिहावंसं वाटलं? " या प्रश्नाबद्दल जरा सविस्तर बोला असं सगळ्यांना सांगितलं...त्यांनी सगळ्यांचं नीट ऐकून घेतलं... त्यांचा हा एक मला स्वभावविशेष जाणवला की "मी म्हणतो तेच खरं आणि तसंच सगळ्यांनी लिहायला हवं " असं चुकूनही त्यांनी कधी म्हटलं नाही..कोणत्याही शंकेवरती त्यांनी "याबद्दल माझा स्वत:चा एक अनुभव सांगतो त्यातून तुम्हाला काही लक्षात घ्यावंसं वाटलं तर बघा " असंच म्हटलं....

त्यांच्या लेखनप्रवासातला " शांतता कोर्ट चालू आहे " या एका महत्त्वाच्या नाटकाच्या लेखनाची सुरुवात कशी झाली याबद्दल त्यांनी खूप सांगितलं....
त्यांचं म्हणणं होतं की नाटककाराला लिहिता लिहिता पात्रं दिसली पाहिजेत, त्यांच्या हालचाली दिसल्या पाहिजेतच शिवाय ते ऐकूही आलं पाहिजे...सारी वातावरणनिर्मिती निदान लेखकाच्या मनात पक्की हवी...( त्यासाठी दिग्दर्शकाला उपयोगी पडणार्या रंगसूचना शक्य तेवढ्या स्पष्ट द्यायला हव्यात...आता दिग्दर्शक त्या किती वापरणार ते तो ठरवेल पण संहितेमध्ये तुमचे नाटक स्पष्ट हवं)...
कमीतकमी वेळात आणि कमीतकमी संवादात खर्या आणि सशक्त व्यक्तिरेखा तयार करणं हे नाटकाचं मोठं बलस्थान आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं...त्यासाठी त्यांनी अपर्णा सेनच्या " मिस्टर ऎंड मिसेस अय्यर" या फ़िल्ममधली बसमधील पात्रांची उदाहरणे दिली आणि ती फ़िल्म खास त्या सीनसाठी तिथे परत पहायला लावली....

त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली ....लेखक सुरुवातीला आपापली पात्रे, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये डोक्यात ठेवून गोष्ट लिहायला सुरू करतो, आणि ठरवलेल्या एका विशिष्ट शेवटाकडे जाण्याच्या दृष्टीने तो लिहित असतानाच कधी कधी जाणवायला लागतं की ते पात्र म्हणतंय मी नाही असा वागणार, मला वेगळं वागायचंय, पण मग त्यासाठी गोष्ट बदलली तरी बदलू द्या, नाटक लांबलं तरी लांबूद्या..., संपादन पुनर्लेखन या तांत्रिक बाबी नंतर हाताळा परंतु आधीच शेवट ठरवून नवनवीन शक्यता सोडून देऊ नका... मला हे फ़ार महत्त्वाचं वाटलं........

या चार दिवसांमध्ये चंद्रकांत कुलकर्णी, गिरिश जोशी , जब्बार पटेल, संदेश कुलकर्णी या मंडळींचंसुद्धा उत्तम मार्गदर्शन लाभलं... पुणे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात जाऊन आम्ही तिथल्या उत्तम छोटेखानी थिएटरात "शांतता कोर्ट चालू आहे " ही फ़िल्म पाहिली , दूरदर्शनवर फ़ार लहान असताना पाहिली होती...आणि त्यातल्या कडी लागण्याच्या दृश्याबद्दल तेंडुलकरांनी झकास स्पष्टीकरण दिलं

लेखक असूनही प्रत्येकाला नाटक तयार कसं होतं, सेट कसा लागतो, प्रकाशयोजना कशी ठरते, तालीम कशी होते हे ठाऊक असणं आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं त्यामुळे त्यांनी सर्वांना जसा येईल तसा अभिनयही करायला लावला...
शेवटच्या दिवशी आम्ही विद्यार्थ्यांनी कार्यशाळेदरम्यान तयार केलेल्या काही (सुमार) कथांचं रंगमंचावर सादरीकरण केलं तेही त्यांनी सहन केलं आणि छान करताय असं म्हणाले.

त्यांना शेवटच्या दिवशी एका सहभागी प्राध्यापकांनी असा प्रश्न विचारला "मला भटक्या लोकांसाठी जर नाटक लिहून सादर करायचे आहे आणि ते त्यांनी पहावे अशी फार इच्छा आहे...पण नाट्यगृहात तर ते येणार नाहीत, मग मी काय करू?"
त्यावर ते म्हणाले, " तुम्हाला एक गोष्ट सांगतो... मी अनुभवलेली..त्यातून तुम्हाला काही लक्षात येतेय का ते बघा..
मी जेव्हा एका नक्षलवादी भागात गेलो होतो तेव्हा तिथल्या एका म्होरक्याने गावातली मंडळी जमवली आणि म्हणाला चला आपण एक खेळ खेळूया.... मी असणार जमीनदार आणि तुम्ही गरीब गावकरी..मग त्या जमीनदाराची ऍक्टिंग करणार्‍याने लोकांना शिव्या द्यायला सुरुवात केली , काहींना फटकावले... खेळ रंगायला लागला... एका क्षणी त्याने तिथल्या स्त्रियांची छेड काढली ( अभिनय) मात्र त्यानंतर लोकांमधील काही तरूण खवळून उठले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला, काही फटके त्याने खाल्ले...मग त्याने हात उंचावून खेळ थांबवला........ त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता.
...
नक्षलवाद आणि राजकीय संदर्भ इथे बाजूला ठेवू थोडा वेळ... म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच,नाटक कुठेही घडू शकते.
यातून शिकायचे काय? भटके नाट्यगृहात येऊ शकत नसतील तर तुमच्या नाटकाने त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे"

अगदी जाताना पुन्हा तीन महिन्यांनी कार्यशाळा परत घ्यायचं ठरलं ,तुम्ही आपापली नाटकं लिहून आणायची.. कोणत्याही समीक्षकाला बोलवायचे नाही, आपणच आपापल्या नाटकांचे समीक्षण करू असं स्वत: तेंडुलकर म्हणाले...
आता मात्र या कार्यशाळेचा योग कधीच येणार नाही...

लक्ष्य सिनेमा... जून २००४

लक्ष्य सिनेमा मला बरा वाटला...


..पण एक मुद्दा नेहमी खटकत / जाणवत असे, ______
ही गोष्ट जर एका एमलेस माणसाला त्याचे ध्येय सापडणे यावर आहे, आणि त्याची एक प्रोमोज मध्ये जहिरात असे की " ही डिस्कव्हर्ड व्हॉट ही वाँटेड इन लाईफ ऍट अमुक अमुक थाउजंड फीट" ( शब्द थोडेफार वेगळे असतील ) अशा अर्थाची काहीतरी....
मग पिक्चर पाहिल्यावर असे वाटले, की ज्या क्षणी त्याने त्याचा आळशीपणा सोडला आणि आय एम ए गंभीररित्या (एकदा पळून आल्यानंतर पुन्हा ) जॉइन केली तेव्हा गोष्ट पूर्ण झाली, ही डिस्कव्हर्ड व्हॉट ही वॉन्टेड इन लाईफ..... मग पुढे तो सैनिक होतो, कारगिल मध्ये पराक्रम गाजवतो की नाही, युद्धात जिंकतो की नाही , मरतो का वाचतो हा प्रश्न लांबचा.... मुख्य सिनेमा कधीच संपला...
( म्हणजे प्रीमाईस यशस्वी होणे किंवा न होणे असा नसून ध्येय सापडणे असा आहे)

हे मी कोणाला कधी बोललो नाही, पण एकदा जावेद अख्तरची मुलाखत चालली होती ,( कोणता सिनेमा चुका सुधारून पुन्हा लिहायला आवडेल? अशा प्रश्नावर त्याने मेरी जंग आणि लक्ष्य या दोन सिनेमांची नावे घेतली होती)) तेव्हा तोही असेच म्हणाला... (म्हटलं बेष्ट... लै खुश झालो...)

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे... शेवट असा का?

१. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

तो दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे १९९५ ऑक्टोबर ला आल्यापासून मग अनेक वर्षे की काय तो एका थिएटराला चालला... आम्ही १९९५ मध्ये सुट्टीत पाहिल्यानन्तर पुन्हा कॉलेज ग्रुपबरोबर परत पाहिला... इतरांना जाम आवडला... पण कथेच्या दृष्टीने दोन तीन घटना तर अजिबात डोक्यात गेल्या...
माझ्या माहितीप्रमाणे लग्नघरातल्या वधूवर डोळा ठेवून तिथे स्वतःचे लग्न तिच्याशी लावण्यासाठी उपस्थित राहण्याची फ्याशन या सिनेमाने सुरू केली...जी पुढे कुकुहोहै, जप्याकिहोहै सारख्या अनेक सिनेमांमध्ये सुद्धा दिसली. ते जाऊदे...

आणि ती हिरॉईन तरी कसली हो... अहाहा......म्हणजे बापाला वाईट वाटू नये म्हणून त्या दुसर्‍या नवर्‍याच्या फ्यामिलीची आणि त्या नवर्‍याचीच वाट लावायची, आणि त्यांच्या नकळत प्रियकराबरोबर गुण उधळायचे, प्रेमगाणी गात शेतांमध्ये हिंडायचे...च्यायला टू टायमिंग करणारी , शुद्ध फसवणूक करणारी (आणि त्याचे उदात्तीकरण करणारी) ही हिरॉईन.... प्रेमं करायची अक्कल आहे पण ते बापाला सांगायची, त्याला ते पटवून द्यायची अक्कल नाही, त्यासाठी जे काही सहन करावे लागेल , त्रास भोगावा लागेल त्याची भीती वाटते म्हणून ही बापाने ठरवलेल्या भारतातल्या मुलाशी लग्न करायला परवानगी देते ...आणि आपला यार आला की मग लपून छपून करा मज्जा... तिची आई त्यातल्या त्यात बरी, की ती म्हणते " पळून जा बाबा इथून या पोरीला घेऊन " पण हा हीरो तरी काय हो, तिच्या आईला वर तोंड करून सांगतो की " जगात अडचणी आल्या की सोपे आणि कमी कष्टाचे मार्ग असतात पण ते चुकीचे असतात "वगैरे वगैरे , म्हणजे तात्पर्य काय की हा तिच्या बापाला आपल्या चांगल्या वागण्याने जिंकून घेईल... आणि त्याच्याकडूनच लग्नाला परवानगी मिळवेल...
...
ठीक आहे, आता कथा इथपर्यंत चढवत नेलीय ना, तर शेवटी काहीतरी अजबच घडते....
-------------ती रेल्वे स्टेशनातली मारामारी घडते मग हा आपल्या बापाला म्हणतो की चला परत जाऊ...गाडीत चढतो , गाडी स्पीड पकडते आणि मग तिचा बाप तिचा घट्ट धरलेला हात सोडून देतो आणि म्हणतो जा...मग ती पळत जाऊन गाडी पकडते वगैरे...
----------------------- पण इथे मुख्य प्रश्न हा की बापाने तिला जायची परवानगी का दिली असेल??

आमचा अंदाज ...........त्या १५ २० सेकंदातले अमरीश पुरीचे स्वगत
" याला आधीच चांगला पिटून काढला बरे झाले....ही ही पोरगी पण एक नंबरची अडाणी...आमच्या या मूर्ख पोरीने इतके गुण उधळले आहेत की सगळ्या गावात आता बदनामी झाली आहे.... कोण बोंबलायला आता हिच्याशी लग्न करणार आहे देव जाणे...
आणि हा भडवा तर बापाबरोबर चालला...ह्याच्यायला ह्याच्या... हा कसला जातोय? हा थांबणार... थांबायलाच पाहिजे यानं... अरे महिनाभर बोंबलत इथे रंगढंग केलेस ना आमच्या नकळत ? तुला भाड्या आता जबाबदारी नको घ्यायला ? खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेड*वाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... खरंतर असल्या मूर्ख, नालायक, वेंधळ्या आणि फ़सवणूक करणार्या या माणसाची अजिबात लायकी नाही...पण आता आपल्या मूर्ख आणि बदनाम पोरीला तरी कोण मिळणार याच्यापेक्षा बरा?? खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला..."....
जा बाई जा...

म्हणजे आता काय झालं ?
मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा वगैरे आवडून बाप प्रभावित झाला नाही तर " माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" या भावनेने नाईलाजाने तो यांच्या लग्नाला तयार झाला असे वाटते...
मग हीरोने हिरॊईनच्या आईपुढे मारलेले डायलॊग सगळे गेले ना बाराच्या भावात... मग सिनेमाचा संपूर्ण दुसरा भाग ज्या गोष्टीसाठी बिल्ड अप केला आहे त्याचीच वाट लागली... आणि आम्हाला येडा का बनवले?

महिलांनी चिडण्याच्या आत हे सांगू इच्छितो की आमचा आक्षेप हीरॊईनच्या ( इंटर्वलच्या आधीच्या ) उदात्त वगैरे प्रेमावर नसून तिच्या फ़सवाफ़सवीच्या वर्तनावर आहे... कोणावर कसे ( मानसिक आणि शारिरिक वगैरे ) प्रेम करायचे हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तिला बापाची भीती वाटते म्हणून एका संपूर्ण कुटुंबाची तिने फ़सवणूक करावी हे अगदीच वाईट...
( अवांतर : माझ्या कॊलेजातील ओळखीच्या एका मुलाच्या साखरपुड्यानंतर लग्नाच्या आधी काही दिवस ती मुलगी तिच्या प्रियकराबरोबर घरातून पळून गेली...या प्रचंड मनस्तापाला कोण जबाबदार ? दिदुलेजा या सिनेमात हीरॊईनचे काही चुकले नाही असे मानणारी ती पोरगी असावी )..