जय सरदेसाई नावाच्या सांगलीतल्या एका हुशार , संवेदनशील माणसाची शाळेपासून ( १९७० ते १९८६) इंजिनियर होईपर्यंत...मग पुढे आयुष्यातील एक से एक वळणांची ही एक बरीचशी इण्ट्रेष्टिंग गोष्ट...( लेखक कमलेश वालावलकर ,राजहंस प्रकाशन ,पृष्ठे ४२५, किंमत १७० रु.)
जयची शाळा, मित्र, अभ्यासातली हुशारी, दहावी बोर्डात येणे, खच्चून अभ्यास, बी ई करताना नाटकाचा नाद लागणे, लेखनाचा छंद, सिनेमात जायचा निश्चय, डीग्री घेतल्यानंतर मराठी सिनेमात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम,पुण्यामध्ये फिल्म बनवणे शिकायसाठी आगमन, पार्टटाईम पत्रकारिता, दिल्लीची बिनधास्त पत्रकार मैत्रीण, नाशिकमधल्या एका कंपनीत मार्केटिंगचा जॉब, पगार वाढत जात असतानासुद्धा काहीतरी करून दाखवण्यासाठी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी नोकरी सोडून अभ्यास चालू, मग तिथले मुंबईतल्या हॉस्टेलचे ,मित्रांचे खच्चून अनुभव...आय ए एस व्हायचा अभ्यास म्हणजे वेड्यासारखा १८-१८ तास अभ्यास , इतिहास,-तत्त्वज्ञान- शास्त्र एकदम तपशीलवार, मग कसल्या तरी विचित्र कारणानं नैराश्य, भयंकर दारू पिणे, प्रचंड सिगरेट, एकूणच सगळ्याचा काही उपयोग नाही असा साक्षात्कार, कशालाच काही अर्थ नाही छापाचे प्रचंड म्हणजे प्रचंड नैराश्य, वैफल्य आणि विचित्र अधोगती...मग काय वाट्टेल ते...
ही कादंबरी सॉलिड चक्रम आहे...एंटरटेनिन्ग आहे,प्रश्न पाडते.. तत्त्वज्ञानाचा कीस पाडते अधून मधून...
नायक हॉस्टेल मध्ये एकटा वगैरे असला की त्याला हे नेहमी पडणारे प्रश्न , मग मित्रांबरोबर चर्चा.... ...--- मी कोण आहे? कसा आहे?जगणं म्हणजे काय? तुझ्या माझ्या अस्तित्त्वाचं प्रयोजन काय?या सगळ्याचा अर्थ काय? वगैरे वगैरे... मग नील्स बोहर, श्रोडिंजर, आईनस्टाईन लोकांची मदत घेऊन आणि तत्त्वज्ञान वापरून प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न आणि मग पुन्हा कशालाच अर्थ नाही, असा निष्कर्ष...कादंबरीत अशा स्टाईलची वर्णनं वारंवार येतात....
...विविध स्त्रीव्यक्तिरेखा झकास जमवल्या आहेत विशेषतः पत्रकार स्त्री....अधूनमधून ( वाचकाच्या भुवया उंचावणारी आणि मराठीत क्वचित दिसणारी ) पेरलेली सेक्स वर्णने ही आहेत... प्रेमभंगाचे दु:ख आणि दारू सिगरेट व्यसन यांच्या परस्परसंबंधाबाबत किंवा आत्महत्या आणि एकूणच मानसिक विकृती यावरही काही चिंतने आहेत...
कादंबरीचे बरेच नाव ऐकले होते.....कोसला पार्ट टू वगैरे कौतुक (?) ऐकले होते....खूपच अपेक्षा निर्माण झाल्या होत्या...वाचताना अर्थात बराच काळ या अपेक्षा टिकवून धरल्या कादंबरीने...
कोसला जरीला सारख्या नेमाडपंती लेखनाची आठवण पुष्कळ वेळा होते आणि वाचताना मजासुद्धा येते..... ( पण आपल्याला वाचताना निव्वळ स्टाईलची कॉपी म्हणून आवडतंय की कसे? तसे आवडावे का? :< हं..शेवटी कशालाच अर्थ नाही, असा निष्कर्ष...)/.. असो..
शेवटी शेवटी मात्र वैफल्यग्रस्त , नैराश्यग्रस्त नायकाची भलतीच वाहवत गेलेली गोष्ट अजिबात आवडली नाही...एवढा वेळ का हे वाचले, असे वाटले...( मग पुन्हा कशालाच अर्थ नाही, असा निष्कर्ष... )
Sunday, June 8, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment