Monday, July 7, 2008

माझा आवडता सिनेमा दामिनी (१९९३)


दामिनी...





कथासार : दामिनी (मीनाक्षी शेषाद्री) या गरीब मुलीचे ऋषी कपूरच्या श्रीमंत घरात लग्न होते, तिथल्या तरूण मोलकरणीवरती बलात्कार करताना आपल्या दिराला आणि त्याच्या काही मित्रांना दामिनी पाहते आणि कोर्टात सत्य बोलून गुन्हेगारांविरुद्ध साक्ष देते,( यात ती तिचा पती आणि सासरच्यांचा रोष ओढवून घेते) मात्र तिला कोर्टात वेडं ठरवलं जातं, घरातून हाकलून वेड्यांच्या इस्पितळात पाठवलं जातं.. तरीही ती तिथून पळून जाऊन सनी देओल या एका हुषार वकिलाच्या मदतीनं त्या मोलकरणीला न्याय मिळवून देते...

पूर्वपक्ष : जे सत्य आहे, ते कोणत्याही अडचणींशी लढून विजय मिळवतंच...प्रिमाईस मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आल्या पाहिजेत.
१.भावना (character) : सत्य
२.संघर्ष (conflict ) : संकटं , अडचणी
३.निराकरण / गोष्टीचे ध्येय. (goal / resolution) विजय मिळवतं..

म्हणजे काय तर दामिनी सनी मिळून सत्यासाठी अमरीष आणि सासरा यांनी उभ्या केलेल्या संकटावर मात करून न्याय मिळवतात.


प्रमुख व्यक्तिरेखा

१. दामिनी. (प्रोटॆगनिस्ट )सरळमार्गी, संस्कारी मोठ्या श्रीमंत घरात अचानक येऊन पडल्यावर मोलकरणीवरचा अत्याचार पाहते...खरं बोलण्यासाठी नवर्याचेही मन वळवू पाहते...पण कितीही संकटं आली तरी सत्याचीच बाजू घेते.
२. ऋषी कपूर : द्विधा मनस्थितीत, न्याय आणि सत्य महत्त्वाचं की कुटुंब...?
३.अमरीष पुरी (ऎंटागनिस्ट): आरोपीचा महापाताळयंत्री वकील, याच्याकडे सर्व संकटांवरचे कायदेशीर (आणि इतरही) उपाय असतात.
४.सनी देओल : सर्वात भावखाऊ रोल.... पत्नीला न्याय मिळवून न देऊ शकलेला एक वैफ़ल्यग्रस्त, व्यसनी वकील पण दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रचंड प्रयत्न, ( हुशारी आणि मारामार्या दोन्हीही) करतो.
( बाकी मंडळीसुद्धा उत्तम ... सासू सासरे, ती सुटेल अशा समजुतीने खोटी साक्ष द्यायला तयार झालेले तिचे अगतिक वडील, परेश रावल,इन्स्पेक्टर कदम, तिच्या बहिणीचा मिमिक्रीवाला नवरा मस्त)...

संघर्ष
कोअर कॊन्फ़्लिक्ट सांगायचा तर सत्य विरुद्ध असत्य असा सनातन संघर्ष...
बाह्य संघर्ष : दामिनीचं सत्य आणि तिच्या सासरकडचे लोक + अमरीष यांचं असत्य यांचा संघर्ष.
शिवाय सनी आणि अमरीष यांचा संघर्ष

आंतरिक संघर्ष : तिचं आणि तिच्या पतीचं नातं ... तो तिला " जाउदे ,विसरून जा" असं सांगतोय आणि ती सत्य आणि न्याय पकडून बसलीय.

आणि या दोघांचाही अंतर्गत आंतरिक संघर्ष असा की नातं महत्त्वाचं की न्याय ?

संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स.
सूड : ऋषी कपूरशी आपल्या मुलीचे लग्न लावू इच्छिणारा एक उयोगपती सूड घेण्याच्या इच्छेने ( आणि ती वेडी झाली की आपल्या मुलीचे पुन्हा ऋषीशी लग्न करून देण्याच्या इच्छेने) दामिनीविरुद्ध अमरीषला मदत करतो.
संकट : दामिनीविरुद्ध अनेक संकटे
पाठलाग : तिच्या मागे पळणारे गुंड.
प्रेम : पतीकडून पूर्वी मिळालेले प्रेम.
फ़सवणूक : तिच्या भोळ्या बापाला खोटं सांगून तिच्याविरुद्ध खोटी साक्ष वदवून घेतात.
छळ :वेड्यांच्या इस्पितळात तिला शॊक देतात.

वाढता संघर्ष :
सुरुवातीला तिला धमक्या, मग कोर्टात तिला वेडं ठरवून इस्पितळात, तिथे शॊक देतात... ती पळून सनीच्या आश्रयाला जाते... मग अटक करायला पोलीस पाठवतात ( सनीने अटकपूर्व जामीन घेतलेला असतो),गुंड पाठवतात ( सनी तुफ़ान मारामारी करतो)... अगदी शेवटी कोर्टात पोचायच्या वेळी तिच्यावर खुनी हल्ला होतो... तेव्हा पळतापळता एके क्षणी एका इमारतीच्या बांधकामाजवळ येऊन पोचते, ती हातात टिकाव घेऊन उलटी फ़िरते आणि गुंडानाच आव्हान देते... हे पाहून इमारतीतील बांधकामावरचे मजूर दगडाविटांच्या मार्याने गुंडांना पळवून लावतात..( हे दृश्य अप्रतिम आहे)... इकडे सनी अमरीषच्या वकिली डावपेचांना "तारीख पे तारीख .."चं भाषण करून वेळ काढतोय... .. मग ती नाट्यमयरित्या पोचते आणि साक्ष देते...( आरोपीच्या वकिलाला लै बोल लावते)..हा उत्कर्षबिंदू...पुढे फ़ॊलिंग ऎक्शन ... मग तिचा नवराही येऊन तिच्या बाजूने साक्ष देतो...कोर्टाचा निकाल... ती खुश...नवरा परत तिच्याबाजूने मिळाला..

या प्रत्येक रायजिंग कॊन्फ़्लिक्ट ( वाढत्या संघर्षा) च्या मुद्द्याला प्रेरणा ध्येय अडचणी आणि कृती यांचा संदर्भ देता येतो...

संवाद
पात्रे आपापले संवाद बोलतात.... अत्यंत स्टाईलाईज्ड अमरीष आणि सनी.. मजा येते.
दामिनी आणि तिचे वडील साधं बोलतात.... ऋषीचं पात्र दोन्ही बाजू समजून घेत मध्यम बोलत राहतं...

अमरीष अणि विशेषत: सनीचे संवाद अप्रतिम / अजरामर वगैरे ...
"ये ढाई किलोका हाथ जब पडता है तो आदमी उठता नही उठ जाता है" किंवा इन्स्पेक्टरला " एक कागजका टुकडा मेरे पास भी है" " कदम संभलकर चल कदम" किंवा शेवटचा " तारीख पे तारीख.." संवाद.

लय
सुरुवातीला व्यक्तिरेखा कळेपर्यंत सावकाश.. गाणी ( बिन साजन झूला झूलूं, जबसे तुमको देखा है सनम)..वगैरे... ऋषीचं तिला मागणी घालणं , प्रेम...पण एकदा लग्नानंतर ती सासरी आल्यावर होळीच्या त्या दिवसानंतर घटना वेगात घडतात...हॊरिझोंटल ऎक्शन...
त्यात तिचं आणि ऋषीचं मानसिक द्वंद्व.. तिथे व्हर्टिकल ऎक्शन..

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) : संघर्ष

आता एक गोष्ट बघू...
एक मुलगा सकाळी उठून शाळेत जातो , त्याचा रिझल्ट कळतो, त्याला शाळेत पहिला आल्याबद्दल बक्षीस मिळतं आणि तो आनंदानं घरी येतो.

ओके..गोष्ट बरी आहे, पण मला त्यातून का मजा येत नाही?
त्यात अजिबात संघर्ष नाही...
शाळेत पहिला आला नाही तर काय होईल ते कळत नाही...
व्हॉट इज ऍट स्टेक? काय पणाला लागलंय?

एका दुसर्‍या मुलाने खूप स्पर्धा निर्माण केली आहे आणि पहिला नंबर येणार्‍या मुलाला दिल्लीला विज्ञान प्रदर्शनात थेट जायला मिळणार आहे...
किंवा त्याला वडिलांनी कबूल केलं आहे की पहिला आलास तर या वर्षी सगळे सिंगापूरला जाऊ.
किंवा तो नेहमी पहिला येतो पण या परीक्षेच्या वेळी त्याचे वडील खूप आजारी होते आणि त्याने पहिलं यावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती...ते त्याला पूर्ण करायलाच हवी..
ही झाली प्रेरणा...ध्येय म्हणजे नातेसंबंध टिकवणे,स्वाभिमान जपणे ...अडचणी म्हणजे तीव्र स्पर्धा, वडील आजारी, पेपर अवघड निघणे वगैरे...पहिला नंबर आणणे ही झाली कृती...
______________________

कोणत्याही गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाचा भाग... संघर्ष नसला तर कोणतीही गोष्ट रटाळ, कंटाळवाणी होणार..
उदा.
i] एखादं पात्र गरज नसताना, कोणीही विचारलं नसताना त्याच्या आयुष्याबद्दल माहिती देत राहतं..
ii]स्थलकाल, इतिहास, निसर्ग याबद्दल अति माहिती देणं.. लेखकाचं जास्त संशोधन झालं असलं की त्याला ते सारं गोष्टीत आणावंसं वाटतं.
iii]गरज नसताना नवनवीन पात्रं फ़क्त विनोदनिर्मितीसाठी आणली जातात, अशाचा जाम कंटाळा येतो.

या चुका कशा सुधाराव्यात?
i]पात्रांची माहितीसुद्धा संघर्षातूनच मिळावी. ( उदा.एखादं पात्र आरोप करतंय, प्रश्न विचारतंय आणि दुसरं पात्र काहीतरी लपवालपवी करतंय, त्यातून होणार्या संघर्षातून पात्रांची माहिती मिळावी)..
ii]वाचकाला किंवा प्रेक्षकाला समोर घडणार्या घटनांसंदर्भातच रिलेव्हंट माहिती अपेक्षित असते, उगाच ऐतिहासिक , नसर्गिक गोष्टींच्या खोलात शिरण्याची गरज नाही.
iii]पात्रांची संख्या मर्यादित असूद्या., एखाद्या प्रसंगामुळे / दृश्यामुळे / व्यक्तिरेखांमुळे मुख्य पात्रांच्या नातेसंबंधांमध्ये काहीही बदल होत नसेल, तर मुख्य थीमशी संबंधित नसलेले अनावश्यक प्रसंग सरळ निर्दयपणे कापून टाकलेले उत्तम.

संघर्षाचे काही प्रकार


आंतरिक संघर्ष : इच्छा, हक्क आणि कर्तव्य यासंदर्भात
मनातलाच बर्यावाईटाचा संघर्ष
बर्याचदा हा संस्कारासंदर्भात असतो.
बाह्य संघर्ष : व्यक्ती आणि नातेसंबंधातला संघर्ष
पठडीतला हीरो आणि व्हिलन यांच्यातला संघर्ष

समाजामधले इतर संघर्ष : व्यावसायिक / राजकीय / जातीय / धार्मिक
___________________________________________________
आणखी एक वेगळ्या प्रकारचे वर्गीकरण मी ऐकले ..त्यावरून माझ्या आवडत्या सिनेमामधली थेट उदाहरणेच देतो..

१. शक्ती... ..दिलिपकुमार आणि अमिताभ यांच्यात आंतरिक संघर्ष ...वडील आणि मुलगा दोघे प्रोटॆगनिस्टच पण त्यांच्यातला संघर्ष अधिक गडद. आणि बाह्य संघर्ष तो (अमिताभ + दिलिपकुमार) आणि अमरीश पुरी यांच्यात. इथे अमरीश ऎंटागनिस्ट...साधारणपणे ऎंटागनिस्ट बाह्य संघर्षाचे कारण असतो..आणि अमिताभच्या मनातले द्वंद्व म्हणजे अंतर्गत आंतरिक संघर्ष...!!?

२. सरफ़रोश : पोलीस ऒफ़िसर आणि आतिरेकी यांच्यातला बाह्य संघर्ष पण अजय राठोड आणि सलीम यांच्यातला आंतरिक संघर्ष
...आणि या आतिरेकी कटाचा सूत्रधार अजय राठोडच्या ओळखीचा पाकिस्तानी गायक असणं, ही वाढती गुंतागुंत आणि शेवटी याला मारू की नको असा अजय राठोडचा अंतर्गत आंतरिक संघर्ष !!!?

३. मला अजिबात न आवडलेला सिनेमा ... मैं प्रेम की दीवानी हूं... ( हाहाहाहाहा) .....
राजश्री फ़िल्म्स च्या साधारणपणे सगळ्याच फ़िल्म्समध्ये संघर्षच आधी खूप कमी... सगळं गोग्गोड... बरं असलाच तर कोणीतरी आजारी पडतं, अपघात होतो,पत्र उशीरा मिळतं आणि गैरसमज होतो असला नियतीवर आधारलेला योगायोगी बाह्य संघर्ष... त्यात अगदीच दम नसतो असं माझं वैयक्तिक मत.

४. काही आंतरधर्मीय विवाहाचे सिनेमे... यात पोरांचे आई-बाप अगदी ऎंटागनिस्ट दाखवले जातात बर्‍याचदा... मग त्यामुळे तेच बाह्य संघर्ष आहेत असे वाटायला लागते, मग शेवटी ते यांना माफ़ वगैरे करतात हे पचनी पडत नाही... त्यासाठी आधीच आईबापांचा विरोध हा आंतरिक संघर्ष मानला पाहिजे , आणि सामाजिक परिस्थितीचा त्यांच्यावरचा दबाव हा बाह्य संघर्ष..

संघर्ष कसा वाढवावा?

नुसतंच टोमणे मारणं, किरकिर करत भांडणं म्हणजे संघर्ष नव्हे..त्यातून काहीही बदल घडत नाही. प्रोटॆगोनिस्टच्या अडचणी व संकटं वाढवत नेणारा, त्याला अधिकाधिक संकटात पाडणारा संघर्ष हवा.त्यासाठी व्यक्तिरेखांवर दबाव वाढत जायला हवा..

काय पणाला लागलंय? ध्येय गाठलं नाही तर काय संकट येणार आहे हे ठरणं महत्त्वाचं..

आयुष्य, प्रेम, संपत्ती, आरोग्य, स्वाभिमान जेव्हा यावरच संकट कोसळतं तेव्हा मग मुख्य पात्र निकराने झगडतं... आपलं ( प्रेमाईसनं ठरवलेलं ) ध्येय गाठण्यासाठी अविश्रांत मेहनत करतं...
आणि या संघर्षातूनच त्याच्यात मोठा बदल घडतो आणि त्यातूनच ते पात्र धडा शिकतं... ( हेच ते तात्पर्य / कथाबीज)

हीरोला अधिकाधिक अडचणीत आणण्यासाठी मुख्य गोष्टीमध्ये काही उपकथानकं ( सबप्लॊट्स) तयार करता येतात.
परंतु ही उपकथानकं मुख्य गोष्टीला विरोध करणारी किंवा पाठिंबा देणारी किंवा त्यासाठी वाचकाला तयार करणारी म्हणजेच संबंधित हवीत.. उदा. खूनी शोधायच्या कथेत डिटेक्टिव्ह हीरो खुनी स्त्रीच्या प्रेमात पडला की गुंतागुंत झालीच.

संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स.
सूड, संकट,पाठलाग, द्वेष,प्रेम,दु:ख, वियोग, बंडखोरी, फ़सवणूक,स्वार्थत्याग, छळ, स्पर्धा, संशोधन,महत्त्वाकांक्षा, सर्व्हायव्हल.

प्रेरणा ध्येय अडचणी कृती

संघर्ष गडद करण्यासाठी प्रेरणा ध्येय अडचणी कृती या गोष्टी सतत चढत्या भाजणीने घडाव्या लागतात.

आता हे एक वाक्य बघू... (सुनील शेट्टी / सनी देओल यांच्या सिनेमात नेहमी असणारी परिस्थिती)
आपल्या वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी अर्जुनला एका साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक आहे, हे माहित असल्याने राणाठाकूर आपल्या गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो, अर्जुनला हे आधीच कळल्याने तो त्यातल्या काहींना गुंगारा देतो आणि न्यायालयाबाहेर उरलेल्यांशी तुफ़ान हाणामारी करून साक्षीदाराला न्यायालयात वेळेत पोचवतो आणि वडिलांना वाचवतो... .

आता या वाक्याचे तुकडे पाडू...

प्रेरणा : वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी
ध्येय : साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक
अडचणी : गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो
कृती : गुंगारा आणि हाणामारी

motivation goal obstacles action या गोष्टी योग्य क्रमाने घडत राहिल्या की व्यक्तिरेखासुद्धा फ़ुलतात, संघर्ष उत्कर्षबिंदूला पोचतो...


ऍरिस्टॉटलचे ड्रामॆटिक स्ट्रक्चर



सुरुवात : यात पहिल्या १० % भागात स्थल,काल,व्यक्ती यांच्याबद्दल माहिती देणारे प्रसंग घडतात.
मध्य : पुढच्या ७५ % भागात नाट्यमय ताण वाढत जातो आणि आणीबाणीच्या परिस्थितीत अत्युच्च ताणापाशी क्लायमॆक्स, इथून माघार अशक्य.
शेवट : आणि मग उरलेल्या १५ % भागात ताणाचे निराकरण आणि तात्पर्य समजते.
____________________________________________




व्यक्तिरेखन
कोणत्याही नाटकातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट.. नुसते संवाद उत्तम असून उपयोग नाही, ज्या माणसांची ही कथा आहे, ती माणसं खरी हवीत.
कमी पात्रांच्या चेकॊव्हच्या एकांकिका, दिवाकरांच्या नाट्यछटा यातून अत्यंत कमी वेळात व्यक्तिरेखा डोळ्यांपुढे उभ्या राहतात.
तेंडुलकरांनी खास दिलेली उदाहरणे...
१. क्रॅश सिनेमामध्ये ( आधीच्या दृश्यात वंशभेद करणारा ) गोरा इन्स्पेक्टर वडिलांच्या आजाराने गांजलेला आहे, तो अगतिकपणे वडिलांसाठी हॊस्पिटलमध्ये भांडतो आहे....माणूस प्रत्येक वेळी पूर्ण दुष्ट / सुष्ट नसतो, ते एक मिश्रण असते, याचे उत्तम उदाहरण.... त्यामुळे तो माणूस म्हणून जास्त खरा भासतो.
२.मिस्टर ऎंड मिसेस अय्यर या सिनेमातील बसमधील पात्रे..कमी वेळात व्यक्तिरेखा सुस्पष्ट....

भावना :प्रत्येक माणसाला कशासाठीतरी असुरक्षित वाटत असतं आणि स्वत:चं महत्त्व वाढावं असं वाटत असतं..( कोणी बोलून दाखवतं, कोणी नाही).
म्हणून माणूस आपल्या चुकांसाठी कोणीतरी दुसर्याला जबाबदार धरतो, आरोप करतो.... असुरक्षितता ही सर्व मानवी भावनांमधली मूलभूत भावना आहे, इतर सर्व भावना यातूनच येतात.कोणीच स्वत:वर पूर्ण समाधानी नसतो.म्हणून प्रत्येकजण आपापल्या कमीपणावर मात करण्यासाठी इतर भावनांचा आधार घेतो.
( उदा. १ प्रतिकारास असमर्थ माणसं छोट्या टीकेबद्दलसुद्धा अतिसंवेदनशील असतात
२. मोठी महत्त्वाकांक्षा कोणत्यातरी कमीपणाच्या भावनेतून येते.).

व्यक्तिरेखेला आकार देणे..
आज आहे तशी ही व्यक्तिरेखा का घडली असेल? तिचा भूतकाळ आणि वर्तमान पडताळून पाहणे हा एक इन्ट्रेस्टिंग प्रकार असतो.
कोणत्याही व्यक्तिरेखेला तीन महत्त्वाची अंगे असतात... सम्पूर्ण त्रिमितीय व्यक्तिरेखा तयार करण्यासाठी त्यांचा अभ्यास फ़ार महत्त्वाचा आहे.
१. शारीरिक
दिसणं. आरोग्य...डोळे, कांती, केस, रंग, लठ्ठ / बारीक,सुंदर / कुरूप, अपंग , बहिरा, अंध, वगैरे..
...निरोगी माणूस आजारी माणसापेक्षा वेगळी प्रतिक्रिया देतो . दिसणं हे मानसिक जडणघडणीसाठी आणि आत्मविश्वासासाठी महत्त्वाचं असतं ज्यातून न्यूनगंड किंवा अहंगंड तयार होतात.
२. सामाजिक
वातावरण.... आजूबाजूची परिस्थिती. श्रीमंती/ गरीबी / पालकांची स्थिती/शांत सुखी स्थैर्य असलेलं आयुष्य...घटस्फ़ोटित पालक, एकपालकत्व,.... मित्रपरिवार, शाळा कॊलेज, शिक्षण, आवडते अभ्यासाचे विषय, सामाजिक जीवन.. वगैरे.
३.मानसिक
पहिल्या दोनातून ही मानसिक जडणघडण होते. व्यक्तिरेखांच्या महत्त्वाकांक्षा, वैफ़ल्य,चक्रमपणा,ऎटिट्यूड, गंड यात येतात..
व्यक्तिरेखांच्या कोणत्याही कृत्याची कारणमीमांसा करण्यासाठी , मोटिव्हेशन समजण्यासाठी हे आवश्यक.


protagonist : प्रोटॆगनिस्ट
ही गोष्ट कोणाची या प्रश्नाचे उत्तर काय??
कथेतलं मुख्य पात्र...कोणत्याही कथेतला संघर्ष सुरुवातीपासून शेवटापर्यंत जी व्यक्ती (किंवा सारख्या विचारसरणीचा समुदाय) पुढे नेते , ती व्यक्ती असते प्रोटॆगनिस्ट म्हणजे रूढार्थाने गोष्टीचा नायक किंवा नायिका....)

मुख्य व्यक्तिरेखेकडे असा एखादा गुण किंवा एखादा विशिष्ट स्वभावविशेष हवा... विशिष्ट बाबतीत थोडासा चक्रम वाटणारा,शंभर टक्के अतिरेकी टोकाचा विचार हवा..त्याचा जो स्वभाव असेल, कंपल्सिव्ह ट्रेट असेल तो अगदी भन्नाट असावा...
आणि त्याच्या त्या विशिष्ट चक्रमपणामुळंच तो काही प्रसंगात संकटात अडकलाय..इथे संघर्ष सुरू होतो...आणि संकटं वाढत वाढत जातात...त्यातून बाहेर पडतापडता धडपड करत करत तो आत आत रुतत जातो...
मुख्य पात्र कशासाठीतरी असमाधानी आहे, परिस्थिती बदलायची धडपड करत आहे... ध्येयासाठी वाट्टेल ते करणारा ,सार्‍यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी झटणारा आहे, आणि कोणी बरोबर नाही आले तर एकटा लढणारा आहे....या ध्येयामध्ये जो तुल्यबळ परंतु सामान्यत: वाईट विचारांचा माणूस अडथळे आणतो, तो ऎंटागनिस्ट...( ही झाली प्रोटॆगनिस्ट प्लॆन डॊमिनेटेड थिअरी)

ऎंटागनिस्ट
अर्थात प्रोटॆगनिस्टच्या विचारांना विरोध करणारा , रूढार्थाने खलनायक....
( कधी कधी याच्या विचारांमधून गोष्ट सुरू होते.... ऎंटागनिस्ट प्लॆन डॊमिनेटेड थिअरी .....
उदा. जेम्स बॊंडचे बरेचसे सिनेमे... किंवा मिस्टर इंडियातला मोगॆम्बो वगैरे.... जगावर राज्य करण्यासाठी यांच्या कारवाया वगैरे चालू असताना त्यांच्या मनसुब्यामध्ये येणारा हीरो)

इतर पात्रे :
नाटकासाठी इतर पात्रांची गरज पडते, मनातले गुंतागुंतीचे विचार सांगायचेत तर पात्रांची कोणाशीतरी चर्चा होणे आवश्यक... मात्र ही पात्रे कथानकाशी आणि प्रेमाईसशी सुसंगत हवीत.उगीचच येणारी जाणारी अनावश्यक पात्रे कंटाळा आणतात....(ही लेखकाची सोय असली तरी प्रेक्षकाला आराखड्याच्या यंत्रांची खडखड जाणवू नये यात लेखकाचे कौशल्य)

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं)

" नाट्यलेखन काय क्लासमध्ये शिकवून येतं का रे? "
" काय एवढं शिकवतात रे लेखन कार्यशाळेत? "
अशा काही सीनियर नाटकवाल्याच्या प्रश्नांना तोंड देत देत आम्ही एक दोन लेखन कार्यशाळांमध्ये जाऊन शिकून वगैरे आलो... मग तिथून प्रेरणा घेत घेत आंतरजालावरती बरंच लेखनतंत्राविषयी वाचलं... पटकथा लेखन शिक्षण आणि नाट्यलेखन शिक्षण या विषयावर आंतरजालावरती प्रचंड साहित्य उपलब्ध आहे, त्यातलं काही वाचून समजून घेतलं, मजा आली...स्वत:च्या लेखनासाठी याचा उपयोग झालाच आणि समीक्षणात्मक लेखनासाठीही नेहमी उपयोग होतो. सरावासाठी घरचा अभ्यास दिलेला आहे काही संस्थळांवरती...तोही भलताच मजेदार आहे...हॊलीवूड मधल्या काही पटकथा,संवाद संस्थळावर उपलब्ध आहेत..त्यांचं या निमित्तानं वाचन झालं..

दरम्यान काही स्क्रीनरायटिंगचा कोर्स केलेली / करणारी काही मंडळी दोस्त झाली... यांनी लेखनतंत्रासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरलेली काही पुस्तके सांगितली, त्यांचा अभ्यास झाला.या सार्‍या अभ्यासातलंच काही इथे थोडक्यात क्रमश: देण्याची इच्छा आहे....

इथे एक स्पष्टीकरण आवश्यक आहे की इथे दिलेले सगळे नियम किंवा ठोकताळे तारतम्याने घ्यायचे आहेत.... प्रत्येक ठिकाणी ते लागू पडणारच असा माझा कोणताही दावा नाही आणि कोणीही करू नये...कुठेकुठे कदाचित काही विसंगतीही सापडण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या आवडत्या कथा / नाटक / चित्रपट अशा कलाकृतींना यातले बरेचसे ठोकताळे फ़िट्ट बसतात असे समजत जाते तेव्हा झकास वाटते.
अजून एक म्हणजे प्रत्येक इंग्रजी शब्दाला मला प्रतिशब्द सापडला नाहीये, तिथेतिथे मी त्यासाठी थोडासा प्रयत्न केला पण त्यातच अडकलो नाही, पुढे लिहीत गेलो आहे.

terminology...यातल्या प्रत्येकावर पुढे काही भागांत लिहिणार आहे.
1.premise.
2.plot
3.dramatic structure
4.protagonist
5.conflict
6.rhythm
7.genre
8.dialogue
9.progression of play...

१. premise...प्रिमाइस याला चपखल मराठी शब्द मला सुचला नाही.. कथासार, कथाबीज, किंवा तात्पर्य वगैरे जवळ जाणारे शब्द आहेत पण प्रिमाईस ला ते अचूक वाटत नाहीत. असो..ते फ़ारसे महत्त्वाचे नाही.मी सध्या याला प्रिमाईसच म्हणेन. (काही लोक यालाच वन लाईन स्टोरी असे म्हणतानाही ऐकले आहे .ते असो.)
लिहायला सुरुवात करण्यापूर्वी आपला प्रिमाईस तयार असणे उत्तम.... आपल्याला नक्की काय सांगायचंय? तेच का सांगायचंय? आणि कुठवर कसं सांगायचंय? अशा प्रश्नांची उत्तरे माहित असायलाच हवीत... प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद, प्रत्येक नवीन व्यक्तीरेखा तुमच्या मूळ प्रिमाईसशी सुसंगत आहे का हे पाहणे अत्यंत आवश्यक असते.प्रिमाईस साधारणपणे गोष्टीतल्या मूलभूत मानवी भावनेबद्दल सांगतो.

उदा. समजा आपली गोष्ट मत्सराबद्दलची आहे. मग मत्सराबद्दल आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे ते ठरलं पाहिजे.
म्हणजे मत्सरामुळे सर्वनाश होतो
मत्सरामुळे मानहानी होते.
मत्सर माणसाला एकटा पाडतो.
मत्सरामुळे माणूस प्रेमाला पारखा होतो.
आता यातलं काहीतरी एक नक्की केलं की आपलं कथासार तयार होणार.

प्रिमाईस मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आल्या पाहिजेत.
१.भावना २.संघर्ष ३.निराकरण / गोष्टीचे ध्येय.
उदा. रोमिओ आणि जुलिएट चा प्रिमाईस असा होईल... सच्चं प्रेम मृत्यूवरही मात करतं.

कोणत्याही नाटकाला / गोष्टीला सुस्पष्ट प्रिमाईस नसला की बरेच गोंधळ निर्माण होतात.थातुरमातुर प्रसंग, नको त्या व्यक्तिरेखा वाढत जातात ...खुद्द लेखक गोष्ट पूर्ण होईपर्यंत गोंधळून जातो. लेखकाला नक्की काय सांगायचंय ते वाचकाला / प्रेक्षकाला कळेनासं होतं...

कधीकधी एखादा साधासा विचार, कल्पना किंवा प्रसंग यापासून गोष्ट सुरू होऊ शकते परंतु लिहिता लिहिता लवकरात लवकर प्रिमाईस तयार होणे आवश्यक असते.

प्रिमाईस जसाच्या तसा संवादात येऊ नये... प्रेक्षकांना तो गोष्ट संपताना आपोआप कळायला हवा... आणि प्रिमाईस काहीही असला तरी लेखकाला तो शेवटी सिद्ध करता यायला हवा.

आणखी एक सांगायचं म्हणजे आपल्या अत्यंत आवडत्या नाटकाचा / सिनेमाचा प्रिमाईस तयार करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नसते पण तो एक मजेदार खेळ होऊ शकतो. ... या धाग्यात असा खेळ खेळून पाहूयात काय?

प्लॉट ( कथानक ?)
प्लॉट म्हणजे विशिष्ट प्रसंगांची, ठराविक क्रमाने केलेली, भावना उद्दिपीत करणारी अर्थपूर्ण मांडणी..
कथानकाशेवटी व्यक्तिरेखेच्या आयुष्यात अर्थपूर्ण बदल घडला पाहिजे.योगायोग नको.( उदा. गरीब कष्टाळू माणसाला शेवटी यश मिळते असा संदेश देताना हीरोला शेवटी लॊटरी लागते आणि तो श्रीमंत होतो , हे चूक...मान्य आहे,असं खरं घडू शकतं...लॊटरी काय कोणालाही लागू शकते पण या हीरोला लॊटरी लागली तर आपला प्रिमाईस खोटा पडला ना.... ).

नुसतंच खरं आयुष्य हे प्रत्येक वेळी परिणामकारक लेखन होऊ शकत नाही...अगदी रिअलिस्टिक नाटकातसुद्धा खर्‍या आयुष्याचा केवळ भास घडतो.पण तेच जसंच्या तसं खरं आयुष्य नव्हे.खर्‍या आयुष्यात बर्‍याचदा कार्यकारणभाव नसतो . पण प्रत्येकाला कार्यकारणभाव असलेल्या भासमान विश्वाची गरज असते आणि गोष्ट ती गरज पूर्ण करते.म्हणून नाटकाची गोष्ट संपूर्ण काल्पनिक किंवा संपूर्ण सत्य नसते तर ती या दोन्हींचे सुयोग्य मिश्रण असते.