Monday, July 7, 2008

माझा आवडता सिनेमा दामिनी (१९९३)


दामिनी...





कथासार : दामिनी (मीनाक्षी शेषाद्री) या गरीब मुलीचे ऋषी कपूरच्या श्रीमंत घरात लग्न होते, तिथल्या तरूण मोलकरणीवरती बलात्कार करताना आपल्या दिराला आणि त्याच्या काही मित्रांना दामिनी पाहते आणि कोर्टात सत्य बोलून गुन्हेगारांविरुद्ध साक्ष देते,( यात ती तिचा पती आणि सासरच्यांचा रोष ओढवून घेते) मात्र तिला कोर्टात वेडं ठरवलं जातं, घरातून हाकलून वेड्यांच्या इस्पितळात पाठवलं जातं.. तरीही ती तिथून पळून जाऊन सनी देओल या एका हुषार वकिलाच्या मदतीनं त्या मोलकरणीला न्याय मिळवून देते...

पूर्वपक्ष : जे सत्य आहे, ते कोणत्याही अडचणींशी लढून विजय मिळवतंच...प्रिमाईस मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आल्या पाहिजेत.
१.भावना (character) : सत्य
२.संघर्ष (conflict ) : संकटं , अडचणी
३.निराकरण / गोष्टीचे ध्येय. (goal / resolution) विजय मिळवतं..

म्हणजे काय तर दामिनी सनी मिळून सत्यासाठी अमरीष आणि सासरा यांनी उभ्या केलेल्या संकटावर मात करून न्याय मिळवतात.


प्रमुख व्यक्तिरेखा

१. दामिनी. (प्रोटॆगनिस्ट )सरळमार्गी, संस्कारी मोठ्या श्रीमंत घरात अचानक येऊन पडल्यावर मोलकरणीवरचा अत्याचार पाहते...खरं बोलण्यासाठी नवर्याचेही मन वळवू पाहते...पण कितीही संकटं आली तरी सत्याचीच बाजू घेते.
२. ऋषी कपूर : द्विधा मनस्थितीत, न्याय आणि सत्य महत्त्वाचं की कुटुंब...?
३.अमरीष पुरी (ऎंटागनिस्ट): आरोपीचा महापाताळयंत्री वकील, याच्याकडे सर्व संकटांवरचे कायदेशीर (आणि इतरही) उपाय असतात.
४.सनी देओल : सर्वात भावखाऊ रोल.... पत्नीला न्याय मिळवून न देऊ शकलेला एक वैफ़ल्यग्रस्त, व्यसनी वकील पण दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रचंड प्रयत्न, ( हुशारी आणि मारामार्या दोन्हीही) करतो.
( बाकी मंडळीसुद्धा उत्तम ... सासू सासरे, ती सुटेल अशा समजुतीने खोटी साक्ष द्यायला तयार झालेले तिचे अगतिक वडील, परेश रावल,इन्स्पेक्टर कदम, तिच्या बहिणीचा मिमिक्रीवाला नवरा मस्त)...

संघर्ष
कोअर कॊन्फ़्लिक्ट सांगायचा तर सत्य विरुद्ध असत्य असा सनातन संघर्ष...
बाह्य संघर्ष : दामिनीचं सत्य आणि तिच्या सासरकडचे लोक + अमरीष यांचं असत्य यांचा संघर्ष.
शिवाय सनी आणि अमरीष यांचा संघर्ष

आंतरिक संघर्ष : तिचं आणि तिच्या पतीचं नातं ... तो तिला " जाउदे ,विसरून जा" असं सांगतोय आणि ती सत्य आणि न्याय पकडून बसलीय.

आणि या दोघांचाही अंतर्गत आंतरिक संघर्ष असा की नातं महत्त्वाचं की न्याय ?

संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स.
सूड : ऋषी कपूरशी आपल्या मुलीचे लग्न लावू इच्छिणारा एक उयोगपती सूड घेण्याच्या इच्छेने ( आणि ती वेडी झाली की आपल्या मुलीचे पुन्हा ऋषीशी लग्न करून देण्याच्या इच्छेने) दामिनीविरुद्ध अमरीषला मदत करतो.
संकट : दामिनीविरुद्ध अनेक संकटे
पाठलाग : तिच्या मागे पळणारे गुंड.
प्रेम : पतीकडून पूर्वी मिळालेले प्रेम.
फ़सवणूक : तिच्या भोळ्या बापाला खोटं सांगून तिच्याविरुद्ध खोटी साक्ष वदवून घेतात.
छळ :वेड्यांच्या इस्पितळात तिला शॊक देतात.

वाढता संघर्ष :
सुरुवातीला तिला धमक्या, मग कोर्टात तिला वेडं ठरवून इस्पितळात, तिथे शॊक देतात... ती पळून सनीच्या आश्रयाला जाते... मग अटक करायला पोलीस पाठवतात ( सनीने अटकपूर्व जामीन घेतलेला असतो),गुंड पाठवतात ( सनी तुफ़ान मारामारी करतो)... अगदी शेवटी कोर्टात पोचायच्या वेळी तिच्यावर खुनी हल्ला होतो... तेव्हा पळतापळता एके क्षणी एका इमारतीच्या बांधकामाजवळ येऊन पोचते, ती हातात टिकाव घेऊन उलटी फ़िरते आणि गुंडानाच आव्हान देते... हे पाहून इमारतीतील बांधकामावरचे मजूर दगडाविटांच्या मार्याने गुंडांना पळवून लावतात..( हे दृश्य अप्रतिम आहे)... इकडे सनी अमरीषच्या वकिली डावपेचांना "तारीख पे तारीख .."चं भाषण करून वेळ काढतोय... .. मग ती नाट्यमयरित्या पोचते आणि साक्ष देते...( आरोपीच्या वकिलाला लै बोल लावते)..हा उत्कर्षबिंदू...पुढे फ़ॊलिंग ऎक्शन ... मग तिचा नवराही येऊन तिच्या बाजूने साक्ष देतो...कोर्टाचा निकाल... ती खुश...नवरा परत तिच्याबाजूने मिळाला..

या प्रत्येक रायजिंग कॊन्फ़्लिक्ट ( वाढत्या संघर्षा) च्या मुद्द्याला प्रेरणा ध्येय अडचणी आणि कृती यांचा संदर्भ देता येतो...

संवाद
पात्रे आपापले संवाद बोलतात.... अत्यंत स्टाईलाईज्ड अमरीष आणि सनी.. मजा येते.
दामिनी आणि तिचे वडील साधं बोलतात.... ऋषीचं पात्र दोन्ही बाजू समजून घेत मध्यम बोलत राहतं...

अमरीष अणि विशेषत: सनीचे संवाद अप्रतिम / अजरामर वगैरे ...
"ये ढाई किलोका हाथ जब पडता है तो आदमी उठता नही उठ जाता है" किंवा इन्स्पेक्टरला " एक कागजका टुकडा मेरे पास भी है" " कदम संभलकर चल कदम" किंवा शेवटचा " तारीख पे तारीख.." संवाद.

लय
सुरुवातीला व्यक्तिरेखा कळेपर्यंत सावकाश.. गाणी ( बिन साजन झूला झूलूं, जबसे तुमको देखा है सनम)..वगैरे... ऋषीचं तिला मागणी घालणं , प्रेम...पण एकदा लग्नानंतर ती सासरी आल्यावर होळीच्या त्या दिवसानंतर घटना वेगात घडतात...हॊरिझोंटल ऎक्शन...
त्यात तिचं आणि ऋषीचं मानसिक द्वंद्व.. तिथे व्हर्टिकल ऎक्शन..

No comments: