Friday, August 1, 2008

ऒलिम्पिक आणि भारत : अपेक्षा क्षमता आणि तारतम्य...

ऒलिंपिक जवळ आलं की वर्तमानपत्रांतून आणि टी व्ही वरून एक विचित्र प्रकारचं मार्केटिंग सुरू होतं, अपेक्षा वाढवणारं बाजारीकरण..आपल्या संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा देणं, त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणं मी समजू शकतो, पण पदकांची अपेक्षा / पदकांची अपेक्षा असं किती म्हणत राहणार ? ( चांगली कामगिरी करणं म्हणजे केवळ सुवर्णपदक आणि सुवर्णपदकच मिळवणं असे नव्हे हे जेव्हा सर्वांना समजेल तो सुदिन.)..

मग चांगली कामगिरी म्हणजे काय ? माझ्या मते स्वत:च्याच उत्तम कामगिरीवर मात करत राहणं आणि ऒलिंपिकसारख्या मोठ्या मंचावरती स्वत:चा बेस्ट परफ़ॊर्मन्स देत राहणं , निदान भारतीय विक्रम मोडत राहणं.. ही अपेक्षा मी करतो....आणि इतपत अपेक्षाच योग्य आहे.

क्षमता :१९९८ मध्ये इंडिया टुडेमध्ये भारतीय खेळाडूंच्या जागतिक कामगिरीविषयक एक तुलनात्मक लेख आला होता...त्यात बर्याच क्रीडाप्रकारातली भारतीय विक्रम आणि जागतिक विक्रम अशी तुलना केलेली होती...




या लेखात कोणताही ब्लेम गेम नव्हता तर केवळ वस्तुस्थिती दर्शवली होती.... मी हा लेख वाचून खचलोच... म्हणजे शारिरीक ताकद आणि दमसास या बाबतीत आपण प्रचंड मागे आणि ज्या गोष्टी अत्याधुनिक तंत्रद्न्यान वापरून शिकायच्या , त्या बाबतीत आणि ट्रेनिन्ग सुविधेतही आपण मागे.... कसे पदक विजेते तयार होणार ?
Throwers eat the same food runners do at the sai centres, only they're allowed a larger quantity. Sports drinks too, unlike water which often merely quenches thirst, reintroduce vital supplements in the body. In the US, Leander would undergo tests merely to measure his sodium loss. Then Dr Michael Bergeron of the Department of Exercise Science, University of Massachussetts, instructed him on his sweat rate (litres/hour) and therefore how much he must replenish. In India, hockey players drink from a tap in the field.
आता काही लोक म्हणतील ध्यानचंद हेच टॆप वॊटर पिऊन खेळायचा ना ? पण अहो असा अद्भुत माणूस शतकात एखादा होतो... सगळ्यांकडून तीच अपेक्षा कशी ठेवता येईल?

टीव्हीवाले वृत्तवाहिन्यांचे पत्रकार काहीही बोलत,दाखवत असतात, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण्यात मतलब नाही पण वृत्तपत्रांचे पत्रकार तरी निदान तारतम्याने लिहितील असं मला वाटत असे.... पण तसे नाही...

काही क्रीडावृत्तपत्रकार भारतातले रेकॊर्ड होल्डर जगात पस्तिसाव्या, चोपन्नाव्या , विसाव्या वगैरे क्रमांकावर आहेत तरी त्यांच्याकडून पद्क अपेक्षतात... मग ती अंजली भागवत असो, अंजू जॊर्ज असो, साईना नेहवाल असो किंवा वीरधवल खाडे....( वर हे आणि की " मग? आम्ही अपेक्षा करणारच.. आमच्या कराच्या पैशातून स्पोर्ट्स मिनिस्ट्री त्यांचा खर्च करते ..." )....आता याला ऒप्टिमिस्टिक राहणं असं ते समजत असावेत.... अशांना ऒलिम्पिक झालं की अपेक्षाभंगाचा मोठा धक्का वगैरे बसतो.... मग हेच पत्रकार "... एक सव्वा अब्ज लोकसंख्येच्या खंडप्राय देशामध्ये दोन तीन पदके मिळू नयेत ? ..." वगैरे लेख पाडण्यात मग्न होतात...
आता या पॆटर्नचाच कंटाळा आलाय अगदी...

आता पहा, वीरधवल पदक मिळवणार पदक मिळवणार , त्याला कशी जनतेने मदत केली म्हणून तो इथवर येऊ शकला... तोच एक ऒलिम्पिकची आशा असले लेख वर्तमानपत्रातून पडायला लागतील, तो मेहेनतीने खेळेल.... चांगली कामगिरीही करेल पण पदक मिळाले नाही म्हणून सामान्य नागरिक त्याला शिव्याही घालेल....पण म्हणून ऒलिम्पिकनंतर त्यातूनच वीरधवल आणि साईना सारख्या खेळाडूंना कारकीर्दीच्या सुरुवातीलाच किती वैफ़ल्य येत असेल...

आपल्या खेळाडूंचे जगातले क्रमांक ( रॆंकिंग या अर्थाने ) पाहिले तर पदक मिळवणे ( म्हणजेच पहिल्या तीनात क्रमांक पटकावणे ) जवळजवळ अशक्यच आहे असे कोणीही म्हणेल.... तरीही ९६ ला पेस, २००० ला मल्लेश्वरी आणि २००४ ला राजवर्धन राठोड यांनी पदके मिळवलीच ना... ही अत्यंत अद्भुत कामगिरी आहे आणि मला त्याबद्दल अत्यंत आदर आणि अभिमान आहे.... पण म्हणून मी आता रोज वर्तमानपत्रात लेख वाचतो की बॊक्सिंगकडून पदकाची अपेक्षा, कुस्तीत पदकाची अपेक्षा, बॆडमिंटनमध्ये पदकाची अपेक्षा हे सारं अंमळ भंपकपणाकडं झुकणारं... म्हणूनच म्हणतो, आपल्या संघाच्या खेळाडूंचे कौतुक केले पाहिजे , शाबासकी दिली पाहिजे पण त्यांच्याकडून तारतम्याने अपेक्षा ठेवली पाहिजे...
जाताजाता : काहीतरी चमत्कार होऊन या वेळी आपल्या ऒलिम्पिक टीमनं दहा बारा पदकं आणून माझेच दात माझ्याच घशात घातले तर मला आनंदच होईल हे वे सां न ल....

"अब और कितना गिरना बाकी है "?

accredited online degrees

२००५ मध्ये "मातृभूमी ए नेशन विदाउट विमेन" नावाचा सिनेमा पाहिला..बरीच परीक्षणं वाचलेली होती,गोष्ट माहित होती, आपण एक सामाजिक आशय असलेला सिनेमा पाहून संदेश वगैरे घेऊन प्रसन्न मनाने बाहेर पडणार इतकी बाळबोध अपेक्षा नव्हती तरी सिनेमा इतका त्रास देऊ शकेल असंही वाटलं नव्हतं... लिंगभेद, स्त्रीभ्रूणहत्या, जातिभेद यांचं इतकं भडक भयानक रूप पाहताना कोणीतरी कानाखाली आवाज काढल्यासारखं वाटलं.....बाहेर येताना सुन्न वगैरे झालोच, मग एक पहिली प्रतिक्रिया म्हणजे एका संवेदनशील विषयावर इतका भडक सिनेमा बनवल्याबद्दल "मनीष झा'ला यथेच्छ शिव्या घातल्या...

पुढचे काही दिवस "मला सिनेमा अजिबात आवडला नाही " असे म्हणत राहिलो " असं कुठे असतं का? आपला समाज इतका काही वाईट व्हायचा नाही "अशा डिनायलमध्येही गेलो....त्यालाही काही अर्थ नव्हता...या विषयावर गुळमुळीत, सपक, गोग्गोड सिनेमा कसा बनवणार होता तो ? आणि समजा बनवला असता तरी इतका भिडला असता का?

तंत्रज्ञान जसं वाढत गेलं तशा गर्भलिंगनिदानाच्या टेस्ट अधिकाहिक विश्वसनीय, परवडणार्‍या होत गेल्या पण त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाण फ़ार वाढलं. १९९४ला स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायदा झाला व गर्भलिंगनिश्चितीवर बंधने घालण्यात आली. तरी १९९१ मध्ये भारतातील स्त्रियांचं प्रमाण हजारी ९७१ होतं ते २००१ च्या सुमारास ९४१ इतकं कमी झालं.असल्या प्रॊब्लेमचं मूळ खेड्यात आणि अशिक्षित जनतेत असावं असा गैरसमज मी सुद्धा अनेक वर्षं जोपासला. पण आकडेवारी काही वेगळंच सांगते. हरयाणा आणि पंजाबमधल्या काही सधन जिल्ह्यांमध्ये स्त्रियांचा जन्मदर ८५०च्याही खाली उतरला आहे, असं ऐकतो...

महाराष्ट्र प्रगत आहे, तिथे असलं नसेल किंवा कमी असेल असं मानण्याचं काही कारण नाही..उलट भारतातील सर्वात जास्त अल्ट्रासाउंड क्लिनिक्स महाराष्ट्रात आहेत आणि जिथे अल्ट्रासाऊंड क्लिनिक्स जास्त तिथे जुवेनाईल सेक्स रेशो घटतोच हे नक्की सिद्ध झाले आहे. ...श्रीमंत आणि प्रगतिशील जिल्ह्यांमध्ये , कारखाने आणि बागायती असलेल्या जिल्ह्यांमध्ये स्त्रीभ्रूणहत्या जास्त दिसते...पुणे मुंबई, कोल्हापूर, नाशिक आणि सांगली हे जिल्हे यात प्रचंड आघाडीवर आहेत.... ( आणि अरुणाचल, मणिपूर आणि छत्तीसगढमधले आदिवासी बहुसंख्य असलेले काही जिल्हे असे आहेत जिथे स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक आहेत.)

जालावरच्या एका चर्चेत सुशिक्षितांपैकी अनेक जण व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली लिंगनिश्चितीचं समर्थन करताना पाहिले तेव्हा अंगावर काटा आला. हायकोर्टात याचसंदर्भात एका जोडप्याने गेल्या वर्षी एक याचिका दाखल केली होती, "पहिली मुलगी असल्यास आम्हाला दुसर्या मुलासाठी लिंगनिश्चितीचा अधिकार मिळायला हवा..माझ्या कुटुंबाचा समतोल राखणं हा माझा मूलभूत मानवी अधिकार आहे" असं त्यांचं म्हणणं होतं....ही याचिका हायकोर्टने कडक शब्दांत फ़ेटाळली की अशी परवानगी देणं हे स्त्रीभ्रूणहत्येला कायदेशीर परवानगी दिल्यासारखं होईल ... ती याचिका फ़ेटाळली म्हणून बरे...तशाही पळवाटा आहेतच...

१९९४ च्या गर्भनिदान विरोधी कायद्यान्वये खालील कारणासाठी गर्भपातांना परवानगी आहे

१....(failure of contraception) चुकून झालेली / नको असलेली गर्भधारणा..

२....( genetic abnormality) गर्भामध्ये काही गंभीर आजार / डिफ़ॊर्मिटी असतील तर
परंतु याच गोष्टी इच्छुकांसाठी उत्तम पळवाटा आहेत...

एका हॊस्पिटलमध्ये नोकरी करणार्या सोनॊलोजिस्टने सांगितलेली गोष्ट प्रातिनिधीक मानता येईल... त्यांनी एका जोडप्याला गर्भलिंगनिदानासाठी स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि हे बेकायदेशीर आहे अशी जाणीव करून दिली. मग त्यांनी बाहेरून कुठून तरी लिंगनिश्चितीचे काम करून घेतले, आणि पुन्हा त्याच हॊस्पिटलला येऊन गायनॆकॊलोजिस्टकडे जाऊन पुढचा कार्यभाग उरकला...अशा वेळी हे जोडपे त्या गायनेकॊलोजिस्टला ही नको असलेली गर्भधारणा आहे असे कारण देते.... ते सोनॊलोजिस्ट म्हणाले, "हे असेच चालू असते, मी तरी काय करू शकतो?"
मला या बाबतीत दोन महत्त्वाचे मुद्दे मांडावेसे वाटतात...
...
१. डॊक्टरांनी जबाबदारीने वागायची आवश्यकता...

वरील उदाहरणात जर बाहेरच्या डॊक्टरांनी गर्भलिंगनिदान सांगितलेच नाही तर हे घडायचा संबंधच येत नाही... बहुसंख्य डॉक्टर जरी हे नियम पाळत असले तरी थोड्या पैशांच्या मोहाने हे सारे करणारे डॉक्टरही आहेतच... याला कोणतेही नैतिक कारण वगैरे असेल असे पटण्यासारखेच नाही...

...असाही एक किस्सा वाचला होता की एक डॊक्टर कायद्याच्या भीतीने स्पष्ट लिंगनिदान सांगत नसत परंतु पुढची अपॉइन्ट्मेंट monday ला दिली तर मेल आणि friday ला दिली तर फ़ीमेल अशी त्यांची पद्धत होती.( त्याबद्दल इतर स्टाफ़कडून पेशंटला आधीच पढवून ठेवण्यात येत असे).. आता या डॊक्टरला कसं काय पकडणार?

एक दक्षिण महाराष्ट्रातले एक मोठे गायनॆकॊलोजिस्ट आहेत ... ३० वगैरे वर्षांची प्रॆक्टिस, मुलगा सून वगैरे सुद्धा डॊक्टर्स, रेप्यूटेड मोठे हॊस्पिटल वगैरे वगैरे झकास आहे.. पण त्यांना बेकायदेशीर गर्भपाताच्या कायद्यान्वये अटक होऊन त्यांचं सोनोग्राफी मशीन सील केलं गेलं, हा पेपरातला फोटो पाहून माझ्या काकानं मला माहिती दिली की त्यांना काही वर्षांपूर्वी सुद्धा अशीच अटक झाली होती, आरोप सिद्ध न होता त्यांना सोडून देण्यात आलं.... म्हणजे एकदा अटक होऊनही त्यांचं काम चालूच राहिलं होतं... इतकी वर्षं प्रचंड कमावूनसुद्धा हेच काम पुन्हा आपल्या मुलाला सुनेला करायला लावणार्या या डॉक्टरांना केवळ पैशांचं मोटिव्हेशन असेल की अजून काही उदात्त विचार असतील ? मला तरी काही उत्तर सापडलं नाही... जनाची नाही निदान मनाची तरी लाज ठेवावी...?

मग कन्व्हिक्शन नसल्यामुळे अशा डॊक्टरांना कायद्याचं भय उरलेलं नाही, कायदा अजून कडक केला पाहिजे, दंड वाढवला पाहिजे, सक्तमजुरी वाढवली पाहिजे वगैरे सारं ठीक आहे पण डॊक्टरांची आणि एकूणच समाजाची मानसिकता बदलेपर्यंत हा मार्ग प्रभावी ठरेल असे मला वाटत नाही.

( कायद्याचा बडगा आणि पोलीस असल्याशिवाय आपण चांगलं वागूच नये का ? दंडुका घेतलेल्या पोलिसानं किती कायदे इम्प्लिमेंट करायचे ? सगळी जबाबदारी पोलिसांचीच का? पोलीसांनी दंगली खून दरोडे यांचा तपास करायचा की तुमचा पोरगा हुक्का ,सिगरेट, ड्रग्ज ओढतो का ते पहायचे? असा प्रश्न एका टॊक शो मध्ये पोलीस अधिक्षक नांगरे पाटलांनी विचारल्याचं इथे आठवतं.. )

२.लिंगभेदाची मानसिकता बदलायची गरज ...


....आपल्याकडे आशीर्वाद तरी कसे असतात? पुत्रवती भव वगैरे.... कथा कादंबर्‍यांतूनसुद्धा देशरक्षणासाठी शूर पुत्र होऊ दे वगैरेच भाषा.... का?.नवीन लग्न झालेल्या बाईला आडून आडून का होईना " मुलगाच हवा" वगैरे टाईपातले सूचक इशारे, कधी टोमणे, घरगुती समारंभात मुलगा असलेल्या बाईला स्पेशल प्रिव्हलेजेस असणे, हुंडा आणि लग्नसमारंभाचा प्रचंड खर्च वधुपित्याला करावा लागणे ( इथे माहितीतला एक आय टीमध्ये काम करणारा एक आंध्रातला इंजिनियर आठवतो जो स्वत:चा लग्नाच्या बाजारातला भाव अंमळ अभिमानानेच २० लाखापर्यंत असेल असे सांगत होता) या असल्या गोष्टीच गर्भवती स्त्रीवरचा मानसिक ताण प्रचंड वाढवत असणार यात शंका नाही. त्यातूनच ती कुटुंबाच्या दबावामुळे स्त्रीभ्रूणहत्येचा टोकाचा निर्णय घेत असणार...

एका दूरच्या नातेवाईक स्त्रीने पहिल्या मुलीनंतर मुलासाठी तीन वेळा गर्भपात करून घेतला होता, असं ऐकलं.... तिचे विचार असे की ती स्वत: तीन बहिणींबरोबर एकत्र वाढलेली होती आणि तिला म्हणे तिच्या मुलीचं असं होऊ द्यायच नव्हतं. ( असं म्हणजे नक्की कसं ते काही मला कळलं नाही आणि तिचंही तेच म्हणणं होतं की बाकीच्यांना काय कळणार माझ्या भावना?")
मातृभूमी सिनेमा पाहिला त्याच काळात एका नातेवाईकांकडे गेलो होतो आणि तिथे महिलावर्गाची आसपास कोणाकडेतरी मूल जन्माला आल्यानंतर काही गुंतागुंत होऊन दुर्दैवाने वाचले नाही , यावर काही चर्चा चालू असताना एक बाई एकदम म्हणाल्या ," ... आणि मुलगा होता हो...." सगळ्या बायकांनी संमतीदर्शक माना हलवल्या...मी जाम उखडलो, "याचा अर्थ काय , तर ती गेलेली मुलगी असती तर तुम्हाला कमी दु:ख झालं असतं, असंच ना?"

मान्यय, या सगळ्या मनात खोलवर रुजलेल्या गोष्टी असतात, पण प्रयत्नपूर्वक त्या कमी तर करायला हव्यात... जिथे अशा गोष्टी दिसतात, अशा रूढी-परंपरांना क्वेश्चन तरी करायला हवं.. ही जबाबदारी कोणाची ?? आपण ते करतो का? की हा तर प्रत्येकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न म्हणून गप्प बसतो ? की कधी हा आगदी चावून चोथा झालेला विषय म्हणून दूर ढकलत राहतो?? साहजिक आहे , मग साउथ दिल्लीचा सेक्स रेशो पोचतो ७६२ वरती आणि बोरीवलीमधला ७२८ वरती... दहा पंधरा वर्षांत आपण केवढे खाली गेलो आहोत...अजून पाच दहा वर्षांत हे आकडे ६०० होतील, ५०० सुद्धा होतील कदाचित.....हे असंच चालू राहिलं तर मातृभूमी सिनेमातलं मनीष झानं वर्तवलेलं भविष्य फ़ार दूर नाही..


म्हणूनच म्हणतो, "अब और कितना गिरना बाकी है "?

माझं आवडतं नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट





नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट
लेखक आणि दिग्दर्शक : गिरीश जोशी
कलाकार : मुक्ता बर्वे
गिरीश जोशी
निर्मिती : महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे

जसे नाट्यलेखनाच्या मूलभूत नियमांबद्दल लिहिले, तसेच लेखनाच्या ठराविक आडाख्यांपासून दूर जाणारे, नियमांच्या साचेबद्ध चौकटी तोडणारे नाट्यलेखन यावरही लिहित आहेच..... चाहूल, साठेचं काय करायचं, लूज कंट्रोल यावर पूर्वी लिहिलं आहेच... तसंच थोडंसं वेगळं हे दोन अंकी नाटक ...

कथासार :
पूर्वी सिनेमा नाटक किंवा टीव्ही या माध्यमासाठी अभिनय आणि इतर तांत्रिक प्रशिक्षण देणार्या संस्था कमी होत्या..आता जसे जसे टीव्ही चॆनल वाढले आहेत, तशी त्या संस्थांची गरज वाढतेय आणि आपण अशा अनेक संस्था आजूबाजूला पाहत आहोत.त्यातून नवनवीन अभिनेते, लेखक , दिग्दर्शक घडत आहेत.ही गोष्ट आहे, अशाच एका संस्थेत लेखन शिकवणार्‍या प्राध्यापकाची आणि त्याच्या विद्यार्थिनीची... ती ऎकेडमीमध्ये लेखन शिकायला आलीय खरी पण तिचं अभ्यासात लक्ष नाही, शिकवलेलं कळत नाही म्हणून सर तिला शिकवणीसाठी घरी बोलावतात...त्यात सर सुरुवातीला तिला एक संपूर्णपणे कल्पनेतली गोष्ट लिहून आणायला सांगतात. पण ती स्वत:च्या आयुष्यातल्या गोष्टीच त्यात फ़िरवून फ़िरवून लिहून आणत राहते...मग सर तिच्यावर वैतागतात , त्यात दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी समोर येतात.

मुलगी एका छोट्या गावातून आलेली आहे, ती गोंधळलेली आहे आणि ध्येयहीन आयुष्य जगत आहे, तिला लेखक व्हायचंय पण ती त्यासाठी तितके कष्ट घेत नाहीये कारण कदाचित तिने स्वत:च सरांचे ऎकेडमीमध्ये येण्यापूर्वीचे लेखन वाचलेले आहे, आणि तिला त्यांचे पूर्वीचे लेखन खूप आवडले आहे, मात्र ती ऎकेडमीमध्ये त्यांच्या पहिल्या तासाला ते जे सांगतात त्याने प्रचंड व्यथित झालेली आहे, तिला जाणवलेले आहे की आता लोकांना आवडतं तेच मोजून मापून लिहायला सांगणारा हा पूर्वीचा आपला आवडता लेखक नव्हे... या विरोधाभासाने ती खचलेली आहे.आणि ती सरांना विचारते की तुम्ही असं का केलंत सर? या साध्या प्रश्नाचं उत्तर सर देऊ शकत नाहीत आणि त्यांचा स्वाभिमान दुखावतो....

पंधरा वर्षांपूर्वी सरांनी थोडेफ़ार नाव कमावलेले आहे आणि आता ते एक नाटक लिहू पाहत आहेत पण गेली तीन वर्षे त्यांना ते जमत नाहीये... वैयक्तिक आयुष्यात त्यांचे बायकोबरोबरचे संबंध दुरावलेले आहेत.. एक दोन फ़ोनमधून ते उत्तम व्यक्त होतात...
सर आणि विद्यार्थिनी दोन्ही पात्रे दुखावलेली आहेत आणि आतून घाबरलेलीसुद्धा....दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात....
लेखन राहते बाजूला आणि ते एकमेकांची वैयक्तिक आयुष्यातली उणीदुणी काढत राहतात. स्व टिकवण्यासाठी दुसर्‍याला दुखवण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही जणू त्यांच्याकडे....पण यातून काहीतरी चांगलं घडतं.. या सार्‍यातून ते आपापल्या चुका शोधतात, उणीवा सुधारायचा प्रयत्न करतात......त्याचे अडलेले नाट्यलेखन पूर्ण होते, तिला एक मोठी सीरियल मिळते. पण त्यांच्यात काही नाजूक बंध निर्माण व्हायची जी काही थोडी शक्यता असते तीही बारगळते आणि ते दोघे समंजसपणे दूर होतात.
_____________
या संपूर्ण नाटकाचे बलस्थान आहे, संवाद....या नाटकाचे नुसते मोठ्याने वाचन करायलासुद्धा फ़ार मजा येते असा माझा अनुभव आहे.......(याची मॅजेस्टिकने छापलेली संहितासुद्धा उपलब्ध आहे.).


गिरीशने लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता अशी मोठी जबाबदारी पेलेली आहे... तो स्वत: एका संस्थेमध्ये लेखन शिकवत असल्याने अशा स्वत:च्या आयुष्यातल्या घटनावर लिहिणार्‍या विद्यार्थ्यांचा अनुभव त्याला नेहमी येत असे असे त्याने एका मुलाखतीत सांगितल्याचे आठवते...शिक्षकाच्या भूमिकेतला लेखन शिकवतानाचा बराचसा तांत्रिक भाग मी त्याच्या कार्यशाळेतसुद्धा त्याच्याच तोंडून जसाच्या तसा ऐकला आहे.. विद्यार्थिनीच्या चमत्कारिक वागण्याने गोंधळलेला, तिच्यात कळत नकळत पणे थोडासा गुंतत जाणारा पण वेळीच दूर जाणारा शिक्षक त्याने चांगला दाखवलेला आहे...मुक्ता बर्वेने सुरुवातीला अभ्यासात लक्ष नसणारी, मठ्ठ वाटणारी पण नंतरची दुखावलेली विद्यार्थिनी उत्तम सादर केली आहे...
दोनच पात्रांचे दोन अंकी व्यावसायिक नाटक पण यात नाट्यपूर्ण घटना नाहीत, प्रेमकथा नाही, रूढ खलनायक नाही,मेलोड्रामा नाही, विषय आहे नाट्यलेखनासारखा रूक्ष ( यावर काय नाटक लिहिणार ?असेही काहींना वाटू शकते )
रंगमंचावर काहीही विशेष घडत नसताना प्रेक्षकाला बंधून ठेवणे अवघडच.... पण हे नाटक ते लीलया करते..

या नाटकाचे अजून एक विशेष म्हणजे हे नाटक सुदर्शनच्या प्रायोगिक रंगमंचावर जितके रंगते तसेच ते व्यावसायिक मंचावरही प्रेक्षकांनी उचलून धरले..
( मी हे नाटक दोन्ही मंचावर पाहिले आहे आणि ते दोन्हीकडे तसेच रंगते असे मला वाटते).
प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांच्या (तथाकथित) रूढ सीमारेषा या नाटकाने अजून धूसर केल्या...
या नाटकाने २००७ मध्ये अमेरिका दौराही केला )